नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत तगडे मुद्दे मांडून विरोधकांची कोंडी करेल असा प्रवक्ता काँग्रेसकडे राहिलेला नाही. वृत्तवाहिन्या गाजवणारे गौरव वल्लभ यांनी देखील काँग्रेसच्या नेतृत्वाला वैतागून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जैवीर शेरगील, शेहजाद पुनावाला, रिटा बहुगुणा-जोशी, टॉम वड्डक्कन असे अनेक काँग्रेस प्रवक्ते आता भाजपची वकिली करू लागले आहेत. कधीकाळी आम आदमी पक्षासाठी (आप) आक्रमक भूमिका घेणाऱ्या शाजिया इल्मी आता भाजपच्या प्रवक्त्या बनल्या असून त्या ‘आप’विरोधात अधूनमधून तोफ डागताना दिसतात.

अडचणीच्या परिस्थितीत पक्षाची बाजू लोकांसमोर मांडणे, ती पटवून देणे आणि विरोधकांचे आरोप खोडून काढण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम राष्ट्रीय प्रवक्ते करत असतात. त्यासाठी कुठल्याही पक्षाचा राष्ट्रीय प्रवक्ता वैचारिकदृष्ट्या भक्कम असावा लागतो, त्याची पक्षावर निष्ठा असावी लागते. पण, काँग्रेसच्या प्रवक्त्यांकडे वैचारिक स्पष्टता आणि निष्ठा दोन्ही नसल्याचे वारंवार पाहायला मिळाले आहे. आता तर पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हेच एकमेव ‘राष्ट्रीय प्रवक्ता’ उरले आहेत. बाकी प्रवक्ते एकामागून एक पक्ष सोडून गेले आहेत किंवा शिल्लक उरलेले वादात सापडलेले आहेत.

हेही वाचा – भाजपा मंत्र्याच्या मुलाची जोडप्याला मारहाण; मध्य प्रदेशमध्ये पक्ष का आलाय अडचणीत?

राम मंदिरापासून तिहेरी तलाक, महिला आरक्षण अशा सगळ्या विषयांवर भाजपच्या वतीने तलवारबाजी करणारे शहजाद पुनावाला मूळचे काँग्रेसचे. त्यांनी २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला, तिथे ‘मुस्लिम प्रवक्ता’ म्हणून संधीही मिळाली. आता ते भाजपच्या प्रमुख राष्ट्रीय प्रवक्त्यांपैकी एक आहेत. जैवीर शेरगील यांनी कित्येक वर्षे काँग्रेसचे प्रवक्तेपण सांभाळले. ते २०२२ मध्ये भाजपमध्ये गेले. त्यांचे अस्तित्व तिथेही जाणवत नाही. प्रियंका चतुर्वेदी यांनी २०१९ मध्ये काँग्रेसला रामराम केला, चतुर्वेदी मुंबईच्या असल्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना लगेच राज्यसभेची खासदारकीही मिळाली. महिलांच्या मुद्द्यावर प्रखरपणे त्या काँग्रेसची बाजू मांडत असत. या सगळ्या प्रवक्त्यांनी पक्ष बदलण्याआधी २०१६ मध्ये काळाची पावले ओळखत रिटा बहुगुणा-जोशींनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांना भाजपने २०१९ मध्ये लोकसभेची उमेदवारीही दिली होती पण, त्यांचा पराभव झाला. आता रिटा बहुगुणा-जोशींना भाजपमध्येही फारसे महत्त्व उरलेले नाही.

काँग्रेस सोडून गेलेल्या बहुतांश प्रवक्त्यांचा गांधी कुटुंबातील सदस्यांच्या व त्यांच्या अवतीभवती असलेल्या कोंडाळ्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप होता. राहुल गांधी भेटत नसल्याची काँग्रेसमधील अनेकांची तक्रार होती, बंडखोर ‘जी-२३’ गटानेही राहुल गांधींच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. काँग्रेस फक्त गांधी कुटुंबाच्या भल्यासाठी चालवली जात असल्याचा आरोप शहजाद पुनावाला यांनी अनेकदा केलेला आहे. पक्षातील नेतृत्वाशी थेट संवाद साधता येत नसेल तर पक्षात कशासाठी राहायचे असे पुनावालाच नव्हे इतरांचेही म्हणणे होते. पक्षामध्ये वैयक्तिक राजकीय विकासाला संधी मिळत नसल्याचे प्रियंका चतुर्वेदी यांचे म्हणणे होते. प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसकडे राज्यसभेची खासदारकी मागितल्याची चर्चा रंगली होती पण, काँग्रेसने त्यांना वाटाण्याच्या अक्षता दिल्यामुळे त्यांनी शिवसेनेमधून खासदारकी मिळवली. त्या फारशा मराठीतून बोलत नाहीत पण, शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने मराठी मुद्दा राज्यसभेत हिरीरीने मांडताना दिसतात.

हेही वाचा – घराणेशाहीवर झोड उडवणाऱ्या भाजपाने राजकीय कुटुंबात दिली ११ जणांना उमेदवारी

गौरव वल्लभ यांना काँग्रेसने राजस्थान विधानसभा निवडणुकीत उदयपूर मतदारसंघातून उमेदवारीही दिली होती तरीही ते भाजपमध्ये गेले आहेत. सनातन, राम मंदिर असे भाजपचे हुकमी मुद्दे त्यांना आपलेसे वाटू लागल्याने त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. सनातनविरोधात काँग्रेसमध्ये बोलू दिले जात नाही अशी त्यांनी तक्रार होती. मोदींच्या आर्थिक धोरणाची चिरफाड करणाऱ्या वल्लभ यांच्यासाठी अर्थकारणापेक्षा सनातन धर्म व राम अधिक महत्त्वाचा ठरला आहे. रिटा बहुगुणा-जोशी यांच्यासारख्या प्रवक्त्यांनीही काँग्रेसमधील अंतर्गत कार्यपद्धतीवर नाराज होत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले हे प्रवक्ते फक्त प्रवक्तेच राहिले आहेत. अगदी शहजाद पुनावाला यांनादेखील पक्षाने राज्यसभेची खासदारकी वा पक्षात मोठे पद दिलेले नाही. बहुगुणा-जोशी, शेरगील आदींची उपयुक्तता संपली असावी असे चित्र भाजपमध्ये पाहायला मिळते. ‘आप’मधून भाजपमध्ये आलेल्या शाजिया इल्मी यांना देखील पक्षाने प्रमुख प्रवक्त्यांच्या रांगेत बसवलेले नाही. ‘आप’च्या संदर्भातील वादावर देखील भाजपच्या वतीने हरदीपसिंह पुरी वा अन्य नेते बोलतात, त्यानंतर एखाद-दोन मिनिटे इल्मींना बोलू दिले जाते. एका पत्रकार परिषदेला तर शेजारी बसलेल्या इल्मींना पुरी विसरून गेले होते. इल्मींनी स्वतःहून बोलण्यास सुरुवात केल्यावर पुरींना इल्मींची आठवण झाली होती.