शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आमने सामने उभे टाकल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनीही यात उडी घेतली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा मेळाव्याचा वारसा केवळ मनसे प्रमुख राज ठाकरे हेच चालवू शकतात, असे म्हणत शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचे आवाहन मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना पत्राद्वारे केले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचा वारसा चालवता आला नाही. तर हिंदुत्व आणि मराठीच्या रक्षणाचे ज्वलंत विचार मांडण्याची क्षमता शिंदे गटात नाही अशी संभावना या पत्रात करण्यात आली आहे. मनसेचे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांच्या मनातील भावना व्यक्त करणारे हे पत्र समाज माध्यमांवर प्रसारित केले आहे.
याबाबत कीर्तीकुमार शिंदे यांना विचारले असता, राज ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय विचारांचे सच्चे वारसदार आहेत, याबाबत आमच्यासारख्या लाखो महाराष्ट्र सैनिकांच्या मनात शंकाच नाही. शिवसेनेच्या दोन गटांमध्ये दसरा मेळाव्याबाबत सुरू असलेल्या हमरीतुमरीमुळे ऐतिहासिक असा दसरा मेळावा आता थट्टेचा विषय होऊ लागला आहे. राज ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मार्गदर्शन करावे ही काही पक्षाची भूमिका नाही, पण सर्वसामान्य महाराष्ट्र सैनिकांची मात्र तशी भावना आहे, असे कीर्तीकुमार शिंदे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवतीर्थावरील दसरा मेळावा हे आपल्या महाराष्ट्रातील केवळ राजकीयच नव्हे तर सांस्कृतिक समीकरणही होते. सलग चार दशकांहून अधिक काळ ‘एक वक्ता, एक मैदान आणि लक्ष लक्ष श्रोते’ हा चमत्कार अवघ्या जगात कुठे पहायला मिळाला असेल तर तो, आपल्या शिवतीर्थावर! दसऱ्याच्या दिवशी मराठीजनांच्या रांगाच्या रांगा ढोल-ताशे वाजवत, गुलाल उधळत शिवतीर्थावर येत आणि बाळासाहेबांकडून मिळालेले राष्ट्रभक्ती आणि महाराष्ट्र धर्माचं ‘बाळकडू’- विचारांचं सोने घेऊन घरी परतत, अशी दसरा मेळाव्याची भावनिक आठवण या पत्रात नोंदवण्यात आली आहे.
दुर्दैवाने, वडिलोपार्जित वास्तूत राहतो इतक्याच पुण्याईवर स्वतःला हिंदूहृदयसम्राटांचे राजकीय वारसदार म्हणवणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या आणि आक्रमक मराठी अस्मितेच्या धगधगत्या विचारकुंडालाच तिलांजली दिली. ज्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी राजकीय पक्षांवर प्रबोधनकार आणि हिंदूहृदयसम्राटांनी संपूर्ण हयातभर लेखणी, कुंचला आणि वाणीने आसूड ओढले, त्याच राष्ट्रद्रोही- धर्मद्रोही पक्षांशी आघाडी करून हिंदुत्वाच्या विचारांवर मतदान करणाऱ्या लक्षावधी शिवसैनिकांचा आणि मतदारांचा विश्वासघात केला, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला! इतके सगळे करूनही स्वत:चा राजकीय पक्ष आणि सरकार या वारसदारांना सांभाळता आला नाहीच, अशी खोचक टीका या पत्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात आली आहे.
हेही वाचा- अशोक चव्हाण यांच्या पक्षांतराची चर्चा; मुंबई- पुण्यात होकाराची तर नांदेडमध्ये नकाराची
एरवी या सर्व गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केले असते. पण आता ” बाळासाहेब ठाकरे यांचे आम्हीच खरे वारसदार” असे म्हणत ‘यू टर्न’ आणि ‘बंडखोर’ असे दोन्ही गट शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची भाषा करत आहेत. लक्ष लक्ष मराठीजनांसमोर हिंदुत्वाचे अग्निकुंड धगधगते ठेवण्यासाठी ज्वलंत भाषण करण्याची क्षमता मात्र त्यांपैकी कुणातच नाही!, अशी संभावना या पत्रात शिंदे गटाची करण्यात आली आहे. ज्या दसरा मेळाव्यामुळे राज्यातील मराठी भूमिपुत्रविरोधी आणि देशभरातील हिंदूविरोधी राजकीय पक्षांना धडकी भरायची, तोच दसरा मेळावा आज राजकीय चेष्टा-मस्करीचा विषय ठरत आहे, याहून मोठी शोकांतिका ती कोणती?
बाळासाहेब ठाकरे आणि शि व से ना या चार अक्षरांवर प्रेम करणारा, त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणारा प्रत्येक मराठी आणि हिंदू व्यथित झाला आहे, गोंधळला आहे. त्याच्या मनातला हा गोंधळ दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. हिंदूंची मरगळलेली मने पुन्हा एकदा चेतवण्याचे, मराठीजनांचा मानसिक गोंधळ दूर करण्याचे कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असलेली एकमेव व्यक्ती या महाराष्ट्रात आहे, ती म्हणजे आपण – हिंदूजननायक श्रीमान राज ठाकरे! म्हणूनच कोट्यवधी हिंदू तसेच मराठीजनांच्या वतीने आमच्यासारख्या लक्षावधी हिंदवी रक्षकांची, महाराष्ट्र सेवकांची आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे की, दसऱ्याला आपण हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर कडवी निष्ठा असणाऱ्या प्रत्येक हिंदूला, प्रत्येक मराठी माणसाला मार्गदर्शन करावे, असे आवाहन या पत्रात राज ठाकरे यांना करण्यात आले आहे.
हेही वाचा- कृषीमंत्र्यांच्या मेळघाट दौऱ्याने नेमके काय साध्य केले ?
दसऱ्यानिमित्त शिवतीर्थावर आपल्या परखड, रोखठोक ‘ठाकरी’ शैलीतील वक्तृत्वाच्या आविष्काराची – “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…” या हाकेची महाराष्ट्र आणि अवघा हिंदुस्थान आतुरतेने वाट पहात आहेत, असे या पत्रात म्हटले आहे.