ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी नव्याने बांधलेल्या भुवनेश्वर आंतरराज्य बस टर्मिनल (ISBT)ला संविधानाचे शिल्पकार बी. आर. आंबेडकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेतल्यानं त्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. नवीन ISBT हे ओडिशातील सर्वात मोठे आणि विमानतळासारख्या सुविधांनी सुसज्ज, असे बाबासाहेब भीमराव आंबेडकर बस टर्मिनल म्हणून ओळखले जाणार आहे. आंबेडकरांच्या नावावर असलेला हा राज्यातील पहिला मोठा प्रकल्प आहे. १५.५ एकरमध्ये पसरलेल्या, १८० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या ISBT चे उद्घाटन या महिन्याच्या अखेरीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. पटनायक यांचे जवळचे विश्वासू आणि व्हिजन 5T चे सचिव व्ही. के. पांडियन यांनी या प्रकल्पाचे बारकाईने निरीक्षण केले असून, ३० जानेवारी रोजी त्या ठिकाणाला भेट दिली होती.

आंबेडकरांच्या राष्ट्र उभारणीतील योगदानाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी टर्मिनलमध्ये दलित आयकॉनचे जीवन आणि आदर्श प्रदर्शित करण्यासाठी ९०० चौरस फुटांची खास गॅलरीसुद्धा ठेवण्यात आली आहे. आंबेडकरांच्या काही वस्तूही गॅलरीत प्रदर्शित केल्या जातील, असे पटनायक म्हणाले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक द्रष्टे नेते आणि समर्पित समाजसुधारक होते. ते दलित आणि समाजातील शोषित घटकांसाठी आशेचा किरण होते. सर्वांना समान न्याय देणारा समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले,” असेही पटनायक म्हणाले.

Narendra Modi death threat
“जगभरात मोदींच्या हत्येचा कट”, भाजपाच्या नेत्याचं खळबळजनक विधान; म्हणाले, “मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर…”
Prakash Ambedkar Vijay Wadettiwar
“आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट, त्यामुळे तुम्ही वंचितच्या…”, प्रकाश आंबेडकरांचा विजय वडेट्टीवारांना इशारा
Nana Patole Offers 2 Extra Seats to Vanchit Bahujan Aghadi from congress quota
वंचितला काँग्रेसच्या कोट्यातून दोन जागा वाढवून देण्याचा प्रस्ताव, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती
arvind kjriwal jail tihar
अरविंद केजरीवाल करणार वर्क फ्रॉम जेल? काय आहेत कायदेशीर तरतुदी?

हेही वाचाः ‘राजकीय विश्रांती’च्या घोषणेनंतर मोदींचं तोंडभरून कौतुक, तेलगू देसमच्या नेत्याच्या भूमिकेमुळे राजकीय चर्चांना उधाण!

एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतानाच ISBTला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिल्यानं हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. राज्याच्या लोकसंख्येच्या १७.१३ टक्के असलेल्या दलित समाजापर्यंत पोहोचण्याचा पटनायक यांचा प्रयत्न म्हणून या हालचालीकडे पाहिले जाते. २०११ च्या जनगणनेनुसार ओडिशाच्या ४.१९ कोटी लोकसंख्येपैकी ७१.८८ लाख लोक हे अनुसूचित जातीचे (SC) म्हणून ओळखले गेलेत. राज्यातील विधानसभेच्या १४७ जागांपैकी २४ आणि लोकसभेच्या २१ पैकी ३ जागा अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत. २०१९ मध्ये सत्ताधारी बिजू जनता दल (BJD) ने २४ विधानसभेच्या १९ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला पाच जागा मिळाल्या होत्या. लोकसभेत बीजेडीने अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या तीनही जागा जिंकल्या होत्या. जरी जातीय गणिताने आतापर्यंत ओडिशाच्या राजकारणात थेट भूमिका बजावली नसली तरी अशा हालचाली दलितांमध्ये बीजेडीबद्दल सकारात्मक धारणा विकसित करण्यात मदत करू शकतात आणि पक्षाला दलितांची मते त्यांच्या बाजूने एकत्रित करण्यास मदत मिळू शकते.

आंबेडकरांच्या नावाला विरोध होण्याची शक्यता कमी

या निर्णयामुळे पटनायक आणि त्यांच्या सरकारला त्यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री बिजू पटनायक यांच्या नावाभोवतीच त्यांचं राजकारण फिरवण्याच्या छापापासूनही मुक्तता मिळणार आहे. मार्च २००० पासून सत्तेत असलेल्या बीजेडीने विमानतळ, उद्याने, विद्यापीठे आणि मार्केट कॉम्प्लेक्स यांसारख्या डझनभर योजना आणि संरचनांना बिजू यांचे नाव दिले आहे. “निवडणुकीच्या फायद्यांहून अधिक या निर्णयामुळे मुख्यमंत्र्यांची एक नवी प्रतिमा निर्माण होण्यास मदत होणार आहे. भारतीय राज्यघटनेबद्दल उच्च आदर असलेला आणि भेदभाव दूर करण्यासाठी काम करणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा समाजापुढे येणार आहे. समाजातील सर्व घटकांच्या कल्याणाची काळजी घेणारा समाजवादी नेता अशी त्यांची प्रतिमा उंचावेल,” असे वरिष्ठ नोकरशहाने सांगितले. आंबेडकरांची प्रतिष्ठित प्रतिमा आणि विविध विभागांमध्ये त्यांची स्वीकारार्हता लक्षात घेता विरोधी पक्षांकडून कमी टीका होण्याची शक्यता आहे.

बीजेडीच्या आतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशातील काँग्रेसच्या अलीकडच्या काळात पुन्हा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नांना तोंड देण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत सलग सहाव्यांदा निवडून येण्याचा प्रयत्न करणाऱ्या सत्ताधारी पक्षाचा हा प्रयत्न आहे. काँग्रेसने बीजेडी आणि भाजप विशेषत: पटनायक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांसारख्या भाजपाचे प्रमुख केंद्रीय नेते यांच्यातील “जवळचे संबंध उघड” करण्याचा प्रयत्न केलाय. “काँग्रेसचे नवे ओडिशा प्रभारी (अजोय कुमार) बीजेडी आणि भाजप एक आहेत, असे भासवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि ओडिशातील जुन्या पक्षाला एकमेव विरोधी पक्ष म्हणून दाखवत आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही हाच मुद्दा उचलून धरला आहे. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी हेसुद्धा मंगळवारी ओडिशात पोहोचणाऱ्या त्यांच्या यात्रेदरम्यान बीजेडीला लक्ष्य करण्याची अपेक्षा आहे. आंबेडकरांना श्रद्धांजली हा त्यांची प्रतिमा उंचावण्यासाठी योग्य मुद्दा असेल, ” असेही बीजेडी नेत्याने सांगितले.

२९ जानेवारी रोजी भुवनेश्वरमध्ये एका सभेला संबोधित करणारे खरगे यांनी बिजू पटनायक यांनी नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, राउरकेला येथील स्टील प्लांट, चिल्का येथील नौदलाचा तळ आणि यांसारख्या संस्था स्थापन करण्यात भूतकाळातील काँग्रेस सरकारांना सहकार्य केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले होते. पण नवीन पटनायक हे राज्यातील नैसर्गिक संसाधने लुटण्यासाठी भाजप नेत्यांची बाजू घेत असल्याचा आरोप खरगे यांनी केला होता.