भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे माजी सदस्य आणि पक्षाच्या आयटी सेलचे माजी संस्थापक संयोजक प्रद्युत बोरा यांनी या आठवड्यात आपल्या ‘लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी’ पक्षासह काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला. २०१५ साली भाजपामधून बाहेर पडल्यानंतर प्रद्युत बोरा यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला होता. व्यवस्थापक सल्लागार असलेल्या बोरा यांनी सेंट स्टीफन कॉलेज, दिल्ली आणि त्यानंतर आयआयएम अहमदबादमधून शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर २००४ साली त्यांनी भाजपात प्रवेश केला. सुरुवातील त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय मीडिया सेलची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर २००७ साली आयटीचे वारे वाहू लागल्यानंतर २००७ ते २००९ पर्यंत आयटी विभागाचे संयोजक म्हणून जबाबदारी सांभाळली.

२०१० साली बोरा भाजपा आसामचे प्रदेश सरचिटणीस म्हणून काम करून लागले. तर २०१३ साली त्यांचा भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आला. तरीही पक्षातील त्यांच्या कामाचे कर्तुत्व निवडणूक निकालाच्या यशात उमटू शकले नाही. २०११ साली आसाम विधानसभेच्या निवडणुकीत बोरा यांनी हिमंत बिस्वा सरमा यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. तेव्हा सरमा हे काँग्रेसमध्ये होते. सरमा यांचा बालेकिल्ला असलेल्या जालुकबरी या मतदारसंघात बोरा यांचा दारूण पराभव झाला. सरमा ७२.०९ टक्के मतदान घेऊन निवडून आले तर प्रद्युत बोरा १२.६१ टक्के मतदान घेऊन दुसऱ्या स्थानावर राहिले.

Controversy between Congress and BJP over Muslim League comment
मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार; ‘मुस्लिम लीग’ टिप्पणीवरून काँग्रेस-भाजपमध्ये वादंग
Rahul Gandhi do a miracle
काँग्रेसला अपेक्षा २००४ च्या ‘सोनिया मॅजिक’ची, राहुल गांधींना शक्य आहे का चमत्कार?
spokesperson, Congress
काँग्रेसमध्ये जीव घुसमटणाऱ्या प्रवक्त्यांची भाजपमध्ये पोपटपंची !
congress chief jitu patwari on bjp
“भाजपा काँग्रेस कार्यकर्त्यांना त्रास देत आहे, म्हणून…”, काँग्रेस खासदाराचा भाजपावर गंभीर आरोप

२०१५ साली बोरा यांनी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यत्वाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. दशकभरापूर्वी मी ज्या पक्षात प्रवेश केला होता, तो पक्ष आता उरला नसल्याची टीका, त्यांनी पक्ष सोडताना केली.

भाजपाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना राजीनामा सोपविताना लिहिलेल्या पत्रात बोरा यांनी पक्षावर अनेक गंभीर आरोप लावले. ते म्हणाले, “मंत्रिमंडळात पंतप्रधान हे सर्वांच्या सहकार्याने काम करतात. पण मंत्रिमंडळात इतरांना काही अधिकार नाहीत. सध्या परराष्ट्र खात्याच्या मंत्र्यांना त्यांच्या विभागातील सचिवांची हकालपट्टी झाली, हे माहिती नाही. कॅबिनेट मंत्र्यांना स्वतःच्या कार्यालयात कर्मचारी आणि ओसडी स्वतःच्या मर्जीने नेमता येत नाहीत. संपूर्ण सत्ता पंतप्रधान कार्यालयाभोवती केंद्रीत झालेली आहे.” तसेच अमित शहा यांना उद्देशून बोरा म्हणाले की, तुमच्या आत्मकेंद्री आणि व्यक्तिकेंद्री निर्णय प्रक्रियेमुळे कार्यकर्त्यांची मोठी तारांबळ उडते.

तसेच पक्षाला सोडचिठ्ठी देण्यासाठी हिमंत बिस्वा सरमा हे देखील कारणीभूत ठरले होते. त्यावेळी बोरा आणि सरमा यांच्यात बरेच वादविवाद होते. सरमा यांचे स्थानिक कट्टरतावादी संघटन उल्फा (ULFA) सोबत संबंध आणि सारधा घोटाळ्यात सरमा यांचा हात असल्याचा आरोप बोरा यांनी केला होता. यावरून त्यांच्यात राजकीय हेवेदावे देखील झाले होते. भाजपाने हिंमत बिस्वा सरमा यांच्यात काय पाहिले? ऐनकेन प्रकारे निवडणूक जिंकणे यापलीकडे सरमा यांचे कोणते गूण भाजपाने पाहिले? भाजपाचा आदर्श कार्यकर्ता कसा असावा, हे सरमा यांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकायचे का? फक्त एखादा व्यक्ती निवडणूक जिंकवून देतो, म्हणून त्याचे पूर्वचरित्र विसरून जायचे का? असे अनेक प्रश्न बोरा यांनी आपल्या पत्रात उपस्थित केले होते.

भाजपातून बाहेर पडल्यानंतर काही दिवसांनी प्रद्युत बोरा यांनी ‘लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी’ नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला. “आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य आणि सामाजिक लोकशाही” या विचारधारेवर आधारीत माझा पक्ष काम करेल. तसेच भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा विरोधात आम्ही निवडणूक लढवू, असे बोरा यांनी जाहीर केले होते. पक्षाची स्थापना झाल्यानंतर वर्षभरातच २०१६ साली आसाम विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकीत एलडीपी पक्षाने १४ जागी निवडणूक लढवली. पण त्यांना एकाही जागी विजय मिळवता आला नाही. बोरा ज्याठिकाणी वास्तव्यास होते, त्या जोरहाट मतदारसंघात त्यांना स्वतःला विजय मिळवता आला नाही. या मतदारसंघात केवळ १.०५ टक्के मतदान घेऊन ते चौथ्या स्थानी होते. यानंतर पुढच्याच २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत एलडीपी पक्ष निवडणुकांपासून लांब राहिला.

पक्ष स्थापन केल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस बोरा यांनी काँग्रेसविरोधात काम केले. एलडीपीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याच्या सहा महिने आधीपासून बोरा आसाम काँग्रेसचे अध्यक्ष भुपेन बोराह यांच्यासोबत काम करत आहेत. मंगळवारी पक्ष विलीन करत असताना प्रद्युत बोरा म्हणाले की, सर्वात आधी देश आणि मग व्यक्तिगत आणि पक्षीय महत्त्वकांक्षा हे तत्त्व घेऊन मला काम करायचे आहे, त्यामुळेच मी माझा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला. “आज ‘आयडिया ऑफ इंडिया’चा विचार जतन करणे हे भारतासमोर सर्वात मोठे आव्हान आहे. भाजप सध्या देशात एकच संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाचा मुकाबला करायचा असेल तर सर्व विरोधकांना एकत्र यावे लागेल.”, असेही बोरा यावेळी म्हणाले.