प्रदीप नणंदकर लातूर रत्नागिरी -नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग लातूर शहरातून वळविण्यात आल्याने राजीव गांधी व महात्मा बसवेश्वर हे दोन पुतळे हटवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लातूरच्या राजकारणात पुतळ्यांचा विषय संवेदनशील असल्योच हे पुतळे न हटवता रस्ता करण्याची कल्पना पुढे येत आहे. लातूर शहरवासीयांना पुतळ्याचा वाद चांगलाच स्मरणात आहे. १९९५ च्या निवडणुकीत महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्याच्या वादावरून विलासराव देशमुख यांना विधानसभेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता .तेव्हापासून लातूरात बसवेश्वरांचा पुतळा हा संवेदनशील विषय झाला. त्यानंतर शहरात राजीव गांधी व बसवेश्वर हे दोन्ही पुतळे उभे राहिले. रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाल्यानंतर लातूर शहरातील राजीव गांधी चौकापासून सुमारे चार किलोमीटर उड्डाणपूल करण्याचे निश्चित झाले होते त्याला मंजुरी मिळाली होती. मात्र काँग्रेस मधील काही दिग्गजांनी नितीन गडकरी यांना उड्डाणपूणामुळे अडचण निर्माण होईल. त्याऐवजी एकतर बाह्यवळण रस्त्याचा वापर करा किंवा आहे तोच रस्ता वापरा अशी गळ घातली. त्यातून हा रस्ता शहरातून वळविण्याचा निर्णय झाला. हेही वाचा >>> नागपूरमधील वज्रमूठ सभेपूर्वीच काँग्रेसमध्ये बेकीचे वातावरण रस्त्याचे काम आता अंतिम टप्प्यात असून राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी लातूर महानगरपालिकेला महात्मा बसवेश्वर व राजीव गांधी हे दोन पुतळे स्थलांतरित करण्याची सूचना केली आहे. महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी असे पत्र आपल्याकडे प्राप्त झाले असून जिल्हा समितीकडे ते पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले. लातूर मधील लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाने माजी पालकमंत्री व निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे भेट घेऊन हा पुतळा हा लिंगायत समाजाच्या भावनेचा विषय असल्यामुळे तो हटवू नये अशी मागणी केली. तेव्हा एक इंचही हा पुतळा हटणार नसल्याचे आश्वासन संभाजी पाटील निलंगेकर यांनी त्यांना दिले . हेही वाचा >>> सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अलिप्त, सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे नाराज? राष्ट्रीय महामार्गावर आतापर्यंत एकही पुतळा नाही मग लातूरमध्येच दोन पुतळे त्या जागी राहतील असे आश्वासन आपण कसे काय दिले, असे निलंगेकर यांना विचारले असता त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नितीन गडकरी यांनी पिंपरी चिंचवड भागात चौकात लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी भुयारी मार्ग व उड्डाणपूल असा वापर केला आहे. त्याच तंत्रज्ञानाचा वापर या दोन्ही चौकात केल्यास वाहतुकीचा प्रश्नही सुटेल व लोकांच्या भावनाही सांभाळल्या जातील यामुळे आपण गडकरी यांना तेच तंत्रज्ञान लातूरात वापरण्यासाठी आग्रह धरणार असल्याचे सांगितले.. सुप्रसिद्ध नगर रचनाकार सुलक्षणा महाजन यांना यासंबंधी विचारले असता त्या म्हणाल्या, मुळात राष्ट्रीय महामार्ग हा एखाद्या शहरातून जाणे शहरवासीयांसाठी धोकादायक आहे .ठाणे शहरवासियांना त्याचा फटका बसतो आहे .राष्ट्रीय महामार्ग लगत सर्विस रस्ता सोडावा लागतो व रस्त्याच्या ठराविक अंतरावर पक्के बांधकाम करता येत नाही, असे नियम आहेत. हे सर्व नियम पाळले पाहिजेत या रस्त्यावर लोकांची ये-जा करताना होणारे अपघात याची पण काळजी घ्यायला पाहिजे. लोकांनुनयाचे निर्णय घेणे अहितकारक असल्याचे मत त्यांनी मांडले. २८ वर्षानंतर लातूरात पुतळ्याचा विषय हा प्रतिष्ठेचा बनला आहे .राष्ट्रीय महामार्गाचा तिढा सुटताना हा प्रश्न कसा मार्गे लागतो यावर पुढील राजकारणाची दिशा अवलंबून आहे.