scorecardresearch

‘पांचजन्य’ साप्ताहिकाकडून जुन्या संसद भवन इमारतीमधील आठवणींना उजाळा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या पांचजन्य साप्ताहिकाने ट्विटरद्वारे जुन्या संसद भवनाच्या इमारतीमधील मोठ्या घटनांचा उल्लेख केला आहे.

Old-parliament-building
पांचजन्य साप्ताहिकाने जुन्या संसद भवनाच्या इमारतीमधील मोठ्या घटनांचा उल्लेख करून आठवणींना उजाळा दिला. (Photo – PTI)

जुन्या संसद भवन इमारतीमध्ये सोमवारी (१८ सप्टेंबर) शेवटची बैठक संपन्न झाल्यानंतर आता नव्या संसद भवन इमारतीमध्ये कामकाजाची सुरुवात केली जाणार आहे. यानिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या पांचजन्य साप्ताहिकाने संसदेशी निगडित काही आठवणींना उजाळा दिला. १९२९ साली शहीद भगतसिंग यांनी कौन्सिल हाऊसमध्ये टाकलेला बॉम्ब, स्वातंत्र्यदिन समारंभ, १९६५ चे भारत-पाक युद्ध, आणीबाणी, २००१ सालचा संसदेवरील दहशतवादी हल्ला, ३७० कलम रद्द करणे आणि इतर मोठ्या घडामोडींबाबत भाष्य करण्यात आले आहे.

पांचजन्यने केलेल्या एका ट्विटमध्ये संसद भवन इमारतीच्या इतिहासाला उजाळा दिला. १९११ साली ब्रिटिशांनी आपली राजधानी कोलकाताहून दिल्ली येथे हलवली. ब्रिटिश वास्तुविशारद एडवर्ड ल्यूटन्स यांना संसद भवनाची इमारत उभारण्याची जबाबदारी दिली गेली. १२ फेब्रुवारी १९२१ रोजी कोनशिला रचण्यात आली आणि सहा वर्षांनंतर ८३ लाख रुपये खर्च करून संसद भवनाची इमारत तयार झाली होती. १८ फेब्रुवारी १९२७ रोजी लॉर्ड आयर्विन यांनी या इमारतीचे उदघाटन केले.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
supriya sule raj thackeray
“राज ठाकरेंचं कौतुक करते, कारण…”, सुप्रिया सुळे यांचं विधान
supriya sule on pankaja munde
पंकजा मुंडेंवरील कारवाईवरून सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका; म्हणाल्या, “निष्ठावंतांवर किती अन्याय…”

१९२९ साली क्रांतिकारक भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय विधानसभा सभागृहात बॉम्ब आणि पत्रके फेकल्याचीही घटना पांचजन्यने सांगितली आहे. “दुपारचे १२.३० वाजले होते. त्यावेळी सभागृहात मदन मोहन मालविय, मोहम्मद अली जिना, मोतीलाल नेहरू, लाला लजपत राय, सरदार पटेल बसले होते, असेही या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यासोबतच भारताला स्वातंत्र्य प्राप्त होत असताना १४ ऑगस्ट १९४७ रोजी रात्री ११ वाजता संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले होते, त्यावेळी राजेंद्र प्रसाद यांनी अधिवेशनाची अध्यक्षता केली होती, अशी आठवण ट्विटमध्ये उद्धृत केली आहे.

साप्ताहिकाने आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, १९६५ साली तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी दिवसातून एकदाच जेवण करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी भारत पाकिस्तानविरोधात युद्ध लढत होता आणि देशाला अन्नाची तीव्र टंचाई होती. अमेरिकने गव्हाचा पुरवठा कमी करण्याची धमकी दिल्याने भारतावरील दबाव वाढला होता. अन्नटंचाईचा सामना करत असताना एका संध्याकाळी शास्त्री यांनी जाहीर केले की, उद्यापासून एक आठवडा रात्रीचे जेवण बनणार नाही. ते पुढे म्हणाले की, लहान मुलांना दूध आणि फळे मिळतील. तर प्रौढ नागरिकांना उपाशी राहावे लागेल. शास्त्री यांच्या आवाहनानंतर पुढील एक आठवडा सर्व रेस्टॉरंट आणि भोजनालयांनी या नियमाचे काटेकोरपणे पालन केले.

याच ट्विटमध्ये १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाचीही आठवण करून देण्यात आली आहे. ज्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लोकसभेत घोषणा केली की, बांगलादेशातील पाकिस्तानी सैनिकांनी आपल्या समोर बिनशर्त आत्मसमर्पण केले आहे. त्यानंतर २१ जुलै १९७५ रोजी आणीबाणी लादली गेली, याचीही आठवण पांचजन्यने करून दिली. तत्कालीन उप गृहमंत्री एफएम मोहसीन यांनी राष्ट्रपतींनी आणीबाणी जाहीर केल्याची घोषणा केली होती.

१९९६ साली माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी संसदेत दिलेल्या अजरामर भाषणाचाही उल्लेख करण्यात आला. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी म्हणाले की, माझ्याकडे बहुमताचा आकडा नाही आणि त्यामुळे माझा राजीनामा मी राष्ट्रपतींकडे सोपवत आहे. “माझ्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला. त्यात आम्ही बहुमत सिद्ध करू शकलो नाहीत, यासाठी मी माझा राजीनामा देत आहे”, अशी प्रतिक्रिया वाजपेयी यांनी त्यावेळी दिली होती. २२ जुलै १९७४ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संसदेत सांगितले की, भारताने यशस्वीरित्या पोखरण येथे आण्विक चाचणी पार पाडली. त्यानंतर २४ वर्षांनी १९९८ साली अटल बिहारी वाजपेयी यांनीही भारताकडे आता अण्वस्त्र आहेत, असी घोषणा संसदेत केली.

२००१ साली लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांनी संसदेवर केलेल्या प्रसंगाचाही उल्लेख करण्यात आला आहे. या हल्ल्याच्या वेळी देशाचे मोठे नेते केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन हे संसदेच्या आत उपस्थित होते. हल्ल्याच्या काही वेळ आधीच पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी संसदेतून बाहेर पडले होते. संसदेबद्दल इतर आठवणी सांगत असताना उत्तराखंड, सिक्कीम, नागालँड, मणिपूर, मिझोराम, झारखंड आणि छत्तीसगड राज्याची निर्मिती याच संसद भवनाच्या इमारतीमध्ये झाली, असेही सांगण्यात आले आहे.

यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांचाही उल्लेख करण्यात आला आहे. याच संसद भवनाच्या इमारतीमध्ये जीएसटी सारखी ‘एक देश, एक कर’ प्रणाली लागू झाली. तसेच काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५-अ हटविण्यात आले, असल्याचेही आठवण करून देण्यात आली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-09-2023 at 21:45 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×