तृणमूल (टीएमसी) काँग्रेस नेते आणि लोकसभा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रेचं कौतुक केले आहे. मागील काही वर्षांत निघालेली ही ऐतिहासिक यात्रा असल्याचे सिन्हा यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी त्यांनी ‘भारत जोडो’ यात्रेची तुलना लालकृष्ण आडवाणींच्या ‘रामरथ’ यात्रेशी केली. सोमवारी पीटीआयशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “मी राहुल गांधीला मारून टाकलं, फक्त…”, हरियाणातील राहुल गांधींचं विधान चर्चेत

नेमकं काय म्हणाले शत्रुघ्न सिन्हा?

“राहुल गांधींची तीन हजार ५७० किलोमीटरची भारत जोडो यात्रा मागील काही दिवसांत निघालेल्या ऐतिहासिक यात्रांपैकी एक आहे. या यात्रेची तुलना तुम्ही १९९०च्या दशकाच्या निघालेल्या लालकृष्ण अडवाणींच्या ‘रामरथ’ यात्रेशी करू शकता. राहुल गांधी आपले नेतृत्व सिद्ध करत आहेत. आगामी २०२४ च्या निवडणुकीत ते पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार असतील”, अशी प्रतिक्रिया खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली आहे.

“शरद पवारांच्या विधानाशी मी सहमत”

पुढे बोलताना शरद पवारांनी राहुल गांधींबाबत केलेल्या विधानाशीही सहमत असल्याचे म्हटलं. “भारत जोडो यात्रेमुळे विरोधकांना एकत्र आणण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती. याबाबत बोलताना ते म्हणाले, शरद पवार हे महाराष्टातील अनुभवी नेता आहेत. ते देशाच्या राजकारणातील चाणक्य आहेत. मी त्यांच्या मताशी सहमत आहे. भारत जोडो यात्रेमुळे एकत्र येण्यास नक्कीच मदत होईल.”

हेही वाचा – “पांडवांनी कधी नोटबंदी केली होती का? कारण ते…” राहुल गांधींचा मोदींना टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पंतप्रधान कोण बनेल? हा निर्णय जनतेचा”

यावेळी त्यांना ममता बॅनर्जींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत विचारलं असता, “२०२४ च्या निवडणुकीत ममता बॅनर्जी “गेम चेंजर” म्हणून सिद्ध होतील. मात्र, ज्याचे उमेदवार जास्त येतील, तो नेता बनेल, पंतप्रधान कोण बनेल याबाबत जनता निर्णय घेईल. ज्याला जनतेचा पाठिंबा असेल तोच पंतप्रधान पदाचा उमेदवार असेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, राहुल गांधी यांच्या कौतुकानंतर काँग्रेसमध्ये परतणार का? असं विचारलं असता, याचं उत्तर ‘खामोश’ असं आहे”, असे ते म्हणाले.