राज ठाकरे यांच्या आवाहनाला उद्धव ठाकरे यांनी लगेचच दिलेल्या प्रतिसादामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात, असे वातावरण राजकीय वर्तुळात तयार झाले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील भेटीमुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत मनसे शिवसेनेशी युती करण्याची शक्यता कमीच असल्याचे एकूणच चित्र आहे.
राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत एकत्र येण्याबाबत सूचक विधान केले होते. ‘आमच्यातील वाद, भांडणे किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे’ असे राज ठाकरे यांनी तेव्हा विधान केले होते. राज ठाकरे यांच्या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला होता. यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येतील, अशी अटकळ बांधली जात होती. ‘ठाकरे बंधूनी एकत्र येणे हे महाराष्ट्राच्या हिताचे’, असे सूचक उद्घगार शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काढले होते. चारच दिवसांपूर्वी उद्दव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या नागरिकांच्या मनात आहे ते प्रत्यक्षात येईल, असे सांगत मनसेसोबत युती होऊ शकते, असे सुतोवाच केले होते. दोन्ही ठाकरे बंधूनी एकत्र यावे ही शिवसेना व मनसेच्या कार्यकर्त्यांची भूमिका होती. तशी पत्रकेही मुंबई, ठाण्यात झळकली होती.
शिवसेना व मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली असतानाच दोन दिवसांपूर्वी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी २०१४ आणि २०१७चा शिवसेनेबरोबरचा अनुभव वाईट असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले तेव्हाच मनसेची वाट वाकडी असल्याचे स्पष्ट झाले होते. २०१७ मध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर युतीचा प्रस्ताव घेऊन बाळा नांदगावनकर हे ‘मातोश्री’वर गेले होते. पण शिवसेनेने तेव्हा प्रतिसाद दिला नव्हता, असा दावा देशपांडे यांनी केला.
महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई उपनगरातील एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये राज ठाकरे यांची भेट घेत सुमारे तासभर चर्चा केली. शिवसेना व मनसे जर एकत्र आले तर महायुतीसाठी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिक या महानगरपालिकांमध्ये आव्हान ठरले असते. तशीही ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात शक्यता कमीच असल्याचे वर्तविले जात होती. फडणवीस यांनी राज ठाकरे यांना काय आश्वासन दिले हे उघड होणे कठीण आहे. पण आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतील मनसेला सामावून घेतले जाईल, अशी शक्यता वर्तविली जाते. कदाचित शिवसेना ठाकरे गटाचे प्राबल्य असलेल्या प्रभागांमध्ये मनसेने वेगळे लढावे, असेही प्रयत्न होऊ शकतात. कारण तिरंगी लढतीचा भाजप किंवा महायुतीला फायदा होईल, असे गणित असू शकते.
उद्धव व राज ठाकरे यांचे ताणले गेलेले संबध तसेच एकत्र आल्यास युतीत ‘मोठा भाऊ’ कोण हा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. त्यातच दोन्ही भाऊ एकमेकांच्या हाताखाली काम करणे शक्यच नाही. यामुळे युती होण्याबाबत साशंकताच होती. फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्याशी संवाद साधून त्यांना उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जाण्यापासून परावृत्त केले असावे, असेही बोलले जाते. फडणवीस व राज ठाकरे यांच्या भेटीने चित्र बदलले असे नाही तर दोन्ही बंधू एकत्र येणे कठीणच होते, अशी प्रतिक्रिया मनसेच्या एका नेत्याने दिली.