आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीतील एक नाव चर्चेचा विषय ठरले आहे, ते नाव आहे संजना जाटव. २५ वर्षीय युवा नेत्या संजना जाटव यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवत त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. काँग्रेसमधील सचिन पायलट हे सर्वांत तरुण खासदार आहेत. जाटव लोकसभा निवडणूक जिंकून सचिन पायलट यांचा रेकॉर्ड तोडू शकतील का, हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जिल्हा परिषद सदस्य ते २०२३ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवण्यापर्यंत आणि आता वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी लोकसभेचे तिकीट मिळविण्यापर्यंत, असा संजना जाटव यांचा आश्चर्यकारक प्रवास राहिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत राजस्थानमधील १० जणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात संजना यांच्या नावाचाही समावेश आहे, त्यांना भरतपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यातील आतापर्यंत जाहीर झालेल्या सर्व उमेदवारांपैकी त्या सर्वांत तरुण उमेदवार आहेत.

Filing of candidature for the last phase election in Maharashtra state starts from today
मुंबई, ठाणे, नाशिकचा तिढा अजूनही कायम; राज्यात अखेरच्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात
Akola election campaign scramble to reach voters in last few hours
अकोल्यात निवडणुकीतील प्रचार शिगेला, शेवटच्या काही तासांत मतदारांपर्यंत पोहोचण्याची चढाओढ; तुल्यबळ तिरंगी लढतीची रंगत
Eknath Shindes Shiv Senas claim on Bhiwandi Lok Sabha
भिवंडी लोकसभेवर शिंदेच्या शिवसेनेचा दावा, कल्याणचे पडसाद भिवंडीत
Bhavana Gawali
यवतमाळ-वाशिममध्ये उत्कंठा शिगेला! महायुतीतर्फे भावना गवळी की संजय राठोड?

कोण आहेत संजना जाटव?

काही महिन्यांपूर्वी त्यांनी अलवरमधील काठुमार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजपाच्या रमेश खिंची यांच्याकडून अवघ्या ४०९ मतांनी त्यांचा पराभव झाला होता. नोव्हेंबर २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत संजना आणि त्यांचे विरोधक खिंची या दोघांनाही ७९ हजारहून अधिक मते मिळाली होती. १९९८ पासून म्हणजेच ज्या वर्षी संजना यांचा जन्म झाला तेव्हापासून काठुमारमधील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने अनुसूचित जातीसाठी राखीव असलेली जागा जिंकलेली आहे. १९९८, २००३ व २०१८ मध्ये काँग्रेसने ही जागा जिंकली होती; तर २००८, २०१३ व २०२३ मध्ये भाजपानेही तीनदा ही जागा जिंकली.

“माझी पहिली विधानसभा निवडणूक होती. मला अनुभव नव्हता. तरीही लोकांनी मला खूप प्रेम दिले. तेव्हा नशिबानं साथ दिली नाही,” असे संजना यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. लोक त्यांना का पाठिंबा देतात, असा प्रश्न केला असता, त्या म्हणाल्या की, जिथे त्या जातात, तिथे लोक त्यांच्याकडे त्यांची मुलगी किंवा सून म्हणून पाहतात. एकंदरीत आपली प्रतिमा अगदी स्वच्छ आहे. “मी वैयक्तिकरीत्या सर्वांच्या संपर्कात आहे. त्यांना मी राजकारणी किंवा त्यांच्यापेक्षा कुणी वेगळी वाटत नाही,” असे त्या म्हणाल्या.

संजना जाटव या प्रियंका गांधी यांच्या ‘लडकी हूं लढ सकती हूं’ या मोहिमेचाही भाग होत्या. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सरचिटणीस भंवर जितेंद्र सिंह आणि भरतपूरचे माजी खासदार व मंत्री विश्वेंद्र सिंह या दोन दिग्गज काँग्रेस नेत्यांचा संजना यांना पाठिंबा आहे. “एवढ्या छोट्या कार्यकर्त्याला संधी दिल्याबद्दल मी पक्षश्रेष्ठींचे, भंवर साहेब व महाराज (विश्वेंद्र) साहेबांचे आभार मानू इच्छिते. मी त्यांची ऋणी आहे,” असे त्या म्हणाल्या. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी प्रियंका आणि राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती. “प्रियंकाजी स्त्रीशक्तीबद्दल बोलल्या आणि त्यांनी महिलांना पुढे येऊन मिळत असलेल्या संधीचे सोने करण्यास सांगितले. मी दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या काळात राहुलजींना भेटले,” असे संजना यांनी सांगितले.

राजकीय वारसा घरातूनच

संजना यांना त्यांच्या घरातूनच राजकीय वारसा लाभला आहे. त्यांचे वडील हरभजन हे ठेकेदार असून, ते उपसरपंचदेखील आहेत. त्यांचे काका कमल सिंह हे अलवरमधील समूची गावचे सरपंच आहेत. “मी माझ्या कुटुंबाला विशेषतः माझे वडील आणि काकांना लोकांची सेवा करताना पाहिले. त्यामुळे मला त्यांच्या पावलावर पाऊल ठेवायचे होते,” असे सांगून त्या म्हणाल्या की, त्यांनी भुसावरच्या भरतपूर येथील महाराजा सूरजमल ब्रिज विद्यापीठाशी संलग्न असणार्‍या गांधी ज्योती महाविद्यालयातून बी.ए.चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अलवर येथील लॉर्ड्स विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली.

२०२१ मध्ये अलवर जिल्हा परिषदेसाठी त्यांनी पहिली निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्या वॉर्ड क्रमांक २९ मधून ४,६६१ मतांनी निवडून आल्या. भरतपूरमधून लोकसभेचे तिकीट मिळाल्यावर त्या म्हणाल्या की, यावेळी त्यांचा दृष्टिकोन थोडा वेगळा असेल. “मी विधानसभेच्या निवडणुकीत अगदी कमी फरकाने हरले; पण त्यातून मला काही गोष्टी शिकायला मिळाल्या. यावेळी रणनीती थोडी वेगळी असेल,” असे संजना यांनी सांगितले.

संजना यांच्यासमोरील आव्हान

गेल्या काही वर्षांत भरतपूरमध्येही कोळी विरुद्ध जाटव अशी निवडणूक होत आली आहे. यंदाही संजना यांच्याविरोधात भाजपाचे रामस्वरूप कोळी उभे आहेत. २०१९ आणि २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने रंजिता कोळी व बहादूरसिंग कोळी यांना उमेदवारी दिली होती; तर काँग्रेसने अभिजीत कुमार जाटव आणि सुरेश जाटव यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसने शेवटची भरतपूरची जागा २००९ मध्ये जिंकली होती. २००९ मध्ये रतन सिंह यांनी भाजपाच्या खेमचंद यांचा ५३.७६ टक्क्यांनी पराभव केला होता. परंतु, २०१४ मध्ये भाजपाला ६०.१७ टक्के आणि २०१९ मध्ये ६१.६२ टक्के मते मिळाली होती.

हेही वाचा : असे काय दडलेय सीएएमध्ये की, आसाम, त्रिपुरा आणि ईशान्य भारत पेटून उठलाय?

संजना यांचे वडील हरभजन आणि आई रामवती देवी यांच्याव्यतिरिक्त त्यांच्या कुटुंबात भाऊ आणि पती कप्तान सिंह आहेत. ते अलवरच्या थानागाझी येथे राजस्थान पोलिसमध्ये हवालदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांना सहा वर्षांचा मुलगा व चार वर्षांची मुलगी, अशी दोन मुले आहेत.