बंगालवरून आणलेल्या मातीचे सोने होईल असे सांगून पुण्यातील हडपसर भागातील एका सराफाला तिघांनी तब्बल ५० लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. यामुळे सराफ व्यावसायिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. मुकेश चौधरी, त्याचे काका आणि अन्य एक असे मिळून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विपुल नंदलाल वर्मा (राहणार हडपसर गाव) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर गावातील येथे पवन ज्वेलर्सचे नंदलाल वर्मा आणि आरोपी मुकेश चौधरी याची अंगठी खरेदीच्या निमित्ताने ओळख झाली होती. त्यानंतर अनेक वेळा दुकानात येणे जाणे सुरू होते. यामुळे त्यांची चांगल्या प्रकारे ओळख झाली. याचदरम्यान फिर्यादीच्या वडिलांसोबत देखील ओळख झाली.

आम्ही बंगालमधून माती आणली आहे. ती माती गरम केल्यानंतर त्याचे सोने होते असे सांगितले. तेव्हा काही माती हातचलाकी करून गरम करून सोने काढून दाखवले. हे पाहिल्यामुळे वर्मा यांचा चौधरी यांच्यावर विश्वास बसला. वर्मा यांना चार किलो माती देण्यात आली. माझ्या घरी लग्न असून मला पैसे पाहिजे अशी मागणी आरोपीने केली. त्यावर वर्मा यांनी आरोपी चौधरी याला सोन्याचे ४८ तोळे दागिने आणि २० लाखाची रोकड दिली.

त्यानंतर वर्मा यांनी आरोपी चौधरी याने दिलेली माती गरम करून सोने तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही केल्या सोने होत नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली असून तिघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे हडपसर पोलिसांनी माहिती दिली.