महाविद्यालये सुरू करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन केले. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अभाविपच्या कार्यकर्त्यांनी थेट वर्ग भरवला.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्चपासून सर्व विद्यापीठे व महाविद्यालये बंद करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून दुकाने, मॉल, चित्रपटगृह सुरू करण्यात आली असून फक्त विद्यापीठ व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहे .ऑनलाइन शिक्षण सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अजूनपर्यंत महाविद्यालये सुरु करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्य दाखवत नाही. यामुळे अभाविप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यायासमोर आंदोलन केले.

नक्की पाहा >> Photos: बियर बार चालू विद्येचं मंदिर मात्र बंद; ठाकरे सरकारविरोधात ABVP रस्त्यावर

शैक्षणिक वर्ष संपत आले तरी देखील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे अजून प्रॅक्टिकल सुरु झालेले नाही. ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय चिंतेची बाब आहे. तसेच अनेक विध्यार्थी हे महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये मिळणाऱ्या नोकरीसाठी प्रयत्नशील असतात तशी तयारी करत असतात जर का महाविद्यालयेच सुरु झाली नाहीत तर कॅम्पस प्लेसमेंट होतील का?, असे प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडलेले आहेत. त्या सर्व विध्यार्थी व पालकांच्या चिंता वाढवण्याचं काम हे सरकार करत आहे राज्य शासनाला विद्यार्थ्यांच्या भवितव्याची काहीही काळजी नाही. लाखो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचे काम हे शासन करत आहे. महाविद्यालये सुरु करण्याबाबत शासनाने विचार करून सर्व महाविद्यालये सुरु करावी अशी मागणी अभाविपकडून करण्यात आलीय.