ज्येष्ठ रंगकर्मी नसीरुद्दीन शाह यांचा सवाल पुणे : प्रामाणिक अभिनय म्हणजे काय मला कळालेले नाही. पण, मुळात अप्रामाणिक अभिनय असा काही प्रकार असतो का? असा सवाल ज्येष्ठ रंगकर्मी नसीरुद्दीन शाह यांनी सोमवारी उपस्थित केला. सत्याच्या जवळ जाणारे आभासी वर्तन म्हणजे अभिनय, अशी व्याख्या त्यांनी केली. रूपवेध प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या हस्ते नसीरुद्दीन शाह यांना तन्वीर सन्मान प्रदान करण्यात आला, त्या प्रसंगी शाह बोलत होते. प्रायोगिक रंगभूमी चळवळीतील महाराष्ट्र कल्चरल सेंटरला प्रदान करण्यात आलेला ‘नाटय़धर्मी पुरस्कार ’ शुभांगी दामले आणि प्रमोद काळे यांनी स्वीकारला. प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक-शाह, नाटय़दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत आणि प्रतिष्ठानच्या कार्यवाह दीपा श्रीराम या वेळी उपस्थित होत्या. शाह म्हणाले, की अप्रामाणिकपणे अभिनय करत नाही. अभिनेते स्वत:च्या आयुष्यातून खूप काही शिकतात, तेच अभिनयाद्वारे सादर करतात. लेखकाने दिलेले शब्द, चांगले वातावरण आणि भूमिकेची त्याने केलेली निवड यावर सगळे अवलंबून असते. सर्व क्षेत्रात जसे आळशी, अति आत्मविश्वासी, स्वार्थी, दिखाऊ लोक असतात तसेच ते चित्रपटांमध्येही असतात. कलाकार चांगला किंवा वाईट नसतो, पण काही लोक इतके वाईट असतात की त्यांना वाईट कलाकार म्हणणे हेदेखील कौतुकाचे वाटेल. शाह म्हणाले,की भारतीय चित्रपट आजही अनेक वेळा नाटकाप्रमाणेच असतो. नाटकाचे ऋण मान्य करत नसला तरी तो नाटकी वाटतो. काही वेळा दिग्दर्शक कलाकाराकडून वेगळा अभिनय काढून घेतात. त्यामुळे कोणत्याही अभिनयाचे श्रेय कलाकाराचे एकटय़ाचे नसते तर ही समुच्चय कला असते. अभिनयाचा प्रामाणिकपणा मोजण्याचे परिमाण नाही. भारतीय चित्रपटसृष्टी अजूनही पुराणकाळात अडकलेली दिसते. निहलानी म्हणाले, की एका लघुपटासाठी कलाकार शोधण्याकरिता फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये गेलो होतो त्या वेळी संचालक गिरीश कर्नाड यांनी ओम पुरी आणि नसीरुद्दीन शाह या दोघांची नावे सुचविताना हे प्रतिभावंत असल्याचे सांगितले होते. कर्नाड यांचे म्हणणे या दोघांनी खरे ठरविले. काही कलाकार भूमिकेमध्ये भावना ओतण्याचा प्रयत्न करतात. काहींचे दिसून येते,तर काहींचे समजून येत नाही. अभिनय नैसर्गिक वाटणे हेच त्यांच्या अभिनयाचे यश आहे. रत्ना पाठक-शाह म्हणाल्या,की चांगला विद्यार्थी असलेले नसीरूद्दीन टिपून घेण्यासाठी भुकेले असतात. भूमिका रिचवणे म्हणजे काय हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे असते. कलाकाराला त्याचा स्वर लावण्यासाठी नाटक उपयोगी पडते. नसीर यांनी त्याचा उत्तम वापर करून घेतला आहे. यज्ञोपवित यांनी महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या कार्याची माहिती दिली. दीपा श्रीराम यांनी प्रास्ताविक केले. गौरी लागू यांनी सूत्रसंचालन केले. रंगभूमी हेच माझे प्रेम रंगभूमी हेच माझे प्रेम आहे. कोणत्याही स्वार्थाविना प्रेम करणारे कलाकार आहेत तोपर्यंत रंगभूमी सुदृढ आणि जिवंत राहणार आहे, असा विश्वास नसीरुद्दीन शाह यांनी व्यक्त केला. एका नाटकामध्ये काम करताना दीपा श्रीराम यांनी सहकलाकार म्हणून प्रोत्साहन दिले. डॉ. श्रीराम लागू यांची ‘गिधाडे’, ‘आधे अधूरे’, ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ आणि ‘सूर्य पाहिलेला माणूस’ ही नाटके पाहण्यापूर्वी रंगभूमीवर असा अभिनय असू शकतो यावर माझा विश्वास नव्हता. त्यांच्यासमवेत रंगभूमीवर काम करू शकलो नाही याचा खेद वाटतो, असेही शाह यांनी सांगितले.