साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या वक्तव्यावरून वादविवाद सुरू असतानाच पिंपरी-चिंचवड येथील साहित्य संमेलनाची तयारी जोरात सुरू आहे. संमेलनाच्या ग्रंथदिंडीचे नियोजन पूर्ण झाले असून संदर्भ ग्रंथाची निर्मिती अंतिम टप्प्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ असोसिएशनच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड येथील हिंदूस्थान अँटिबायोटिक्स मैदानावर होत आहे. एका बाजूला या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या वक्तव्यांवरून वादंग सुरू असले, तरी त्याचा संमेलनाच्या तयारीवर कोणताही परिणाम झालेला नाही. थेट पंतप्रधानांसंदर्भात अनुचित वक्तव्ये केल्यामुळे संतप्त झालेले भाजपचे खासदार अमर साबळे यांनी सबनीस यांना पिंपरी-चिंचवडमध्ये पाऊल ठेवू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे सबनीस यांना पुरविण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या संमेलनाचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित झाला असला, तरी या घडमोडींपासून चित्त विचलित होऊ न देता साहित्यिकांचे स्वागत करण्यासाठी यजमान संस्था उत्सुक असून साहित्य संमेलनाच्या आयोजनाची तयारी जोरात सुरू आहे. संतकवी, तंतकवी, पंतकवी या संकल्पनेवर आधारित तीन स्वतंत्र चित्ररथ शुक्रवारी (१५ जानेवारी) निघणाऱ्या ग्रंथिदडीच्या अग्रभागी असतील. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, गोरा कुंभार, मुक्ताबाई, बहिणाबाई आणि शाहीर यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी हे या चित्ररथांचे सारथ्य करणार आहेत. अभंग, पोवाडा आणि श्लोकगायनाच्या सुरावटीमध्ये हे चित्ररथ मार्गस्थ होणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका भवन चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून शुक्रवारी (१५ जानेवारी) दुपारी दोन वाजता ग्रंथिदडीचा शुभारंभ सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. अमेरिकेतील भारतीय दूतावासाचे उच्चायुक्त ज्ञानेश्वर मुळे, सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे आणि संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे या दिंडीमध्ये सहभागी होणार आहेत. महिला संतांची दिंडी, माहिती तंत्रज्ञान दिंडी, कामगार दिंडी, पर्यावरण दिंडी, विविध देशांतील परदेशी विद्यार्थ्यांचा पारंपरिक पेहरावातील सहभाग यासह झिम्मा, फुगडी आणि मंगळागौरीचे खेळ करणाऱ्या महिलांचे स्वतंत्र पथक वैशिष्टय़पूर्ण ठरणार आहे. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, राज्यघटना, सकल संत गाथा, महात्मा जोतिबा फुले यांचे ग्रंथ, शिवाजी सावंत यांची कादंबरी, मंगेश पाडगावकर यांचे कवितासंग्रह, महानुभाव साहित्यातील लीळाचरित्र, चिंचवडच्या मोरया गोसावी यांचे चरित्र हे ग्रंथ पालखीत ठेवण्यात येणार आहेत. पखवाजवादक, टाळकरी आणि विणेकरी यांच्यासह निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या विद्यार्थ्यांचे ढोल-ताशा, लेझीम-झांजपथक, पाचंगे बंधूंचे सनई-चौघडा आणि तुतारीवादन, साताऱ्याचे कुलकर्णी यांच्या अब्दागिरी आणि वारकरी झेंडे ग्रंथिदडीची शोभा वाढविणार आहेत. संमेलनाच्या टपाल तिकिटाचे अनावरण साहित्य संमेलनाचे टपाल तिकीट प्रकाशित झाले असून प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी याच्या हस्ते या तिकिटाचे अनावरण शुक्रवारी करण्यात आले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, समन्वयक सचिन इटकर या वेळी उपस्थित होते. या रंगीत तिकिटावर संमेलनाचे बोधचिन्ह वापरण्यात आले असून पिवळ्या रंगाची लिलीची फुले आणि हिरव्या पानांच्या गुच्छामुळे हे तिकीट पाहणाऱ्याच्या नजरेत भरते. या संमेलनासाठी होत असलेल्या माहिती तंत्रज्ञानाचा वापर आणि आता टपाल तिकिटामुळे संमेलनाच्या आठवणी रसिकांच्या स्मरणात राहतील, असे स्वप्नील जोशी याने सांगितले.