बाजार समितीची कारवाई

मार्केट यार्ड येथील चार डाळिंब आडत्यांनी शेतक?ऱ्यांच्या पट्टीतून तसेच खरेदीदारांकडून दोन वर्षांमध्ये नियमापेक्षा अधिक लेव्ही कापून घेत १२ कोटी २२ लाख १३ हजार रुपयांची लूट केली आहे. या फसवणुकीबाबत बाजार समितीने संबंधित आडत्यांना लुटीच्या रकमेसह दीड पट दंडाची रक्कम म्हणजेच ३० कोटी ५५ लाख ३३ हजार रुपये भरण्याची नोटीस दिली आहे. नियमापेक्षा अधिक कापलेली रक्कम आणि दंडाची रक्कम न भरल्यास त्यांच्याकडून सक्तीची वसुली केली जाईल, अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी गुरुवारी दिली.

देशमुख म्हणाले, के. डी. चौधरी, मे. सिद्धारूढ फ्रूट एजन्सी, मे. दिलीप बाळकृष्ण डुंबरे, मे. भास्कर नागनाथ लवटे या चार आडत्यांचे दप्तर तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. १ एप्रिल २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीतील शेतकऱ्यांच्या पट्टय़ा सनदी लेखपालाकडून तपासण्यात आल्या. त्यामध्ये चार आडत्यांनी हमाली, भराई, तोलाई नियमापेक्षा अधिक कापली आहे. खरेदीदारांकडून लेव्ही रक्कम अधिक घेतली आहे. तसेच बाजार समिती शुल्क आणि देखरेख शुल्क कमी भरल्याचे स्पष्ट झाले आहे. या आडत्यांनी दोन वर्षांच्या कालावधीत तब्बल १२ कोटी २२ लाख १३ हजार ५३४ रुपयांची लूट केली आहे.

प्रशासकीय ठराव क्रमांक सहानुसार दीड पट दंड आकारण्याचा अधिकार बाजार समितीला आहे. एकूण लुटीच्या रकमेवर दीडपट दंड आकारल्यास ही रक्कम ३० कोटी ५५ लाख ३३ हजार ८३५ रुपये इतकी होते. आडत्यांना दंडासह ही रक्कम भरावी लागणार आहे. अन्यथा सक्तीने या रकमेची वसुली केली जाईल. या आडत्यांनी शेतकऱ्यांसह खरेदीदार आणि बाजार समितीची फसवणूक केली असल्याचे देशमुख यांनी सांगितले.