जगभरात धुमाकुळ घालणाऱ्या जीवघेण्या करोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यातील करोनाबाधितांचा व यामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडाही वाढत आहे. पुण्यात आज सकाळपासून पाच जणांचा करोनाने बळी घेतला आहे. शहरातील करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 13 वर पोहचली आहे. सकाळापासून शहरातील नायडू रुग्णालयात -1, नोबेल रुग्णालयात – 1 आणि ससून रुग्णालयात 3 अशी एकूण 5 जणांचा मृत्यूची नोंद  झाली आहे.  महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पुणे शहरात आज अखेर 1567 नागरिकांनी करोनाची तपासणी केली असून त्यापैकी 1417 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. तर 158 रुग्ण बाधित आढळले आहेत. तसेच या दरम्यान 17 जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज अखेर शहरात एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याचे आरोग्य विभाग मार्फत सांगण्यात आले आहे.

सरसकट बंदी असतानाही आदेशाचे पालन होत नसल्यामुळे करोना विषाणूचा संसर्ग वाढत असून दररोज नव्या रुग्णांची भर पडत आहे. महर्षिनगर, कोंढव्यासह या लगतच्या पेठांमधील भागात सोमवारी सर्वाधिक रुग्ण आढळून आल्यामुळे हा भाग सील करण्यात आला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील काही भागात संपूर्ण टाळेबंदी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या बाबतची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे, मात्र संबंधित भागातील रुग्णालये, औषधे विक्री दुकाने, दूध विक्री, किराणा माल, भाजीपाला दुकाने अशा अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार आहेत. परंतु, या भागातील नागरिकांनी घराबाहेर पडणे, आपल्या भागातून दुसऱ्या परिसरात जाणे आणि वाहतुकीवर संपूर्ण निर्बंध घालण्यात आले आहेत.

संबंधित भागात संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. टाळेबंदी केलेल्या भागात करोना बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे परिसरातील अन्य नागरिकांनाही संसर्ग होण्याच्या शक्यतेने प्रशासन याबाबत अधिक सक्रिय झाले आहे.