‘मी शिकत असताना आम्हाला प्रश्नांवर विचार करायला सांगायचे. आताच्या महाविद्यालयांमध्ये मेंदू वापरायलाच शिकवत नाहीत! ..जे प्रश्नच विचारणार नाहीत असे विद्यार्थी आपल्याला घडवायचे आहेत का? ..समस्या एकाची आणि त्याचे उत्तर तिसऱ्याच सल्लागाराने शोधायचे हे बरोबर नाही. ज्याची समस्या असते त्यानेच ती सोडवायला हवी, आपण फक्त त्याला मदत करू शकतो ..आम्हाला नेहमी वेडे ठरवले जाते. पण आम्ही करतो तेच सामान्य नाही का? खरे तर प्रत्येकानेच असा विचार करायला नको का?..,’ दिल्लीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डुनू रॉय बोलत होते.
बेघर आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी काम करणाऱ्या ‘हॅझार्ड्स सेंटर’ या प्रतिसाद गटाचे संचालक असलेले रॉय ‘किलरेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’च्या निमित्ताने पुण्यात आले होते. शहरातील सहा महाविद्यालयांमध्ये रॉय यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी शैक्षणिक व्यवस्था आणि सामाजिक प्रश्नांबरोबरच ई-कचऱ्याच्या प्रश्नावरही भाष्य केले.
प्रत्येक शहरातील बेघर कामगारांची संख्या किती, त्यानुसार किती लोकसंख्येमागे किती आसरा गृहे उभारावी लागतील अशा प्रकारचे अभ्यास होणे आवश्यक असल्याचे रॉय यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘वीटभट्टी कामगार दररोजच्या कामात किती ऊर्जा खर्च करतात आणि त्यानुसार त्याने किती किलो कॅलरी अन्नातून घ्यायला हव्यात या विषयावर आम्ही एक अभ्यास केला होता. मात्र त्यासाठी प्रचंड पैसा लागत असल्याचे लक्षात आले. या प्रकारच्या पाहण्या आणि संशोधन स्वस्तात होणे आवश्यक आहे. ते करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांमध्येही संशोधन व्हायला हवे.’’
 
‘संगणक, मोबाईलचा गाभा विषारी घटकांचाच!’

संगणक आणि मोबाईल फोनमध्ये अवजड धातू (हेवी मेटल्स) वापरले जात असून ते मज्जासंस्थेसाठी हानीकारक ठरू शकतात, असे रॉय यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘या वस्तूंच्या उत्पादन प्रक्रियेतील व्यक्तींवर तसेच त्या वापरणाऱ्यांवरही या विषारी घटकांचा परिणाम होऊ शकतो. यावर मात्र अभ्यास होत नसल्याचे दिसून येते. कमी विषारी घटक वापरून आणि कमी खर्चात हे तंत्रज्ञान कसे वापरता येईल याबाबत संशोधनाची आवश्यकता आहे. काही दिवसांनी संगणकावरही सिगारेटप्रमाणे ‘इंज्युरियस टू हेल्थ’ अशी सूचना लिहिलेली दिसू शकेल! ’’