कोरडे हवामान आणि मध्य भारतातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यात उष्णतेची लाट तीव्र होत आहे. विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील दिवसाच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याने उन्हाच्या झळा आणि तीव्र उकाडा जाणवत आहे. विदर्भात अनेक ठिकाणचे तापमान ४७ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून, पुढील दोन दिवस त्यात आणखी वाढ होण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील उष्णतेच्या लाटेची स्थिती २८ मेपर्यंत कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राजस्थानमधून निर्माण झालेली उष्णतेची लाट गेल्या पाच ते सहा दिवसांमध्ये मध्य भारतातून पुढे सरकली आहे. याच भागातून राज्याकडे कमी उंचीवरून अतिउष्ण वारे येत आहेत. त्यातच सध्या कोरडय़ा हवामानाची स्थिती आहे. त्यामुळे तापमानात मोठय़ा प्रमाणात वाढ नोंदविली जात आहे. सध्या विदर्भातील उष्णतेच्या लाटेने तीव्र स्वरूप धारण केले आहे. सोमवारी (२५ मे) अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४७.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. नागपूरचे तापमान ४७ अंशांवर, तर अमरावती, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, ब्रह्मपुरी आदी भागांतील तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. मराठवाडय़ातही उष्णतेची लाट तीव्र होते आहे. परभणी येथे ४६ अंश तापमानाची नोंद झाली. नांदेडचा पारा ४५ अंशांपुढे, तर औरंगाबादचा पारा ४३ अंशांवर पोहोचला आहे. मध्य महाराष्ट्रातील तापमानातही लक्षणीय वाढ नोंदविली जात आहे. सोलापूर आणि जळगाव येथील तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. पुणे, सातारा शहरांत तापमानाने चाळिशी ओलांडली असून, सांगली, नाशिक आदी ठिकाणचा तापमानाचा पारा ४० अंशांच्या आसपास आहे. मोसमी वाऱ्यांना लवकरच चालना अम्फान चक्रीवादळानंतर १७ मे पासून अंदमान समुद्र आणि निकोबारच्या बेटांवरच थांबलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या पुढील प्रवासाला चालना मिळण्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे. पोषक वातावरण निर्माण होऊन मोसमी वारे पुढील दोन दिवसांत बंगालच्या उपसागरात आणि अंदमानच्या उर्वरित भागात वाटचाल करतील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ही स्थिती कायम राहिल्यास २ जूनपर्यंत मोसमी वारे केरळमध्ये दाखल होऊ शकतात.