अमली पदार्थाची तस्करी आणि गुन्हेगारी कृत्यांसाठी अल्पवयीन युवक-युवतींचा केला जाणारा वापर हा मणिपूरमधील सध्याची सर्वात गंभीर समस्या आहे. त्याला आळा घालण्याबरोबरच मणिपूरमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी सरहद संस्थेतर्फे हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे. १५ ऑगस्टपासून ही हेल्पलाइन कार्यान्वित होईल.
सरहद संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष संजय नहार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ‘मणिपूरमधील पर्यटन : संकटे आणि संधी’ या विषयावर तेथील राज्य सरकारतर्फे इम्फाळ येथे आयोजित राष्ट्रीय परिसंवादात सरहद संस्थेतर्फे मी सहभागी झालो होतो. मणिपूर हे दक्षिण-पूर्व आशियाचे प्रवेशद्वार असून या महत्त्वाच्या राज्यामधील विविध प्रश्नांसाठी पुढाकार घेण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. यामध्ये मणिपुरी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, युवकांना व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण, पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम या बाबींचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.
अमली पदार्थाची तस्करी आणि गुन्हेगारी कृत्यांसाठी अल्पवयीन युवक-युवतींचा केला जाणारा वापर ही तेथील गंभीर समस्या असून त्याला आळा घालण्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे. पुणे-मुंबई आणि महाराष्ट्रात आणण्यात आलेल्या अशा तरुणांची सुटका करून त्यांना परत पाठविणे आणि शक्य तसे पुनर्वसन करणे या योजना आहेत, असेही नहार यांनी स्पष्ट केले.