आपल्या देशात आता कोणी काय खायचे, काय घालायचे हे सांगितले जात आहे. या विरोधात आवाज उठल्यास सरकारकडून तो आवाज दाबला जात आहे, त्यामुळे आपल्या देशात असहिष्णुता वाढली आहे, असे जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी म्हटले आहे. तसेच निवडणुका असोत किंवा नसोत सरकार कोणतेही असले तरी सेन्सॉरशिपविरोधात आमचा लढा चालूच राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. एनजीएमए येथे भाषण करताना सरकारच्या सांस्कृतिक आणि कलाविषयक धोरणांवर टीका केल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच भाषण मध्येच थांबवण्यात आले होते. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. अमोल पालेकर म्हणाले, मला ज्यावेळी संस्थेकडून कार्यक्रमास बोलवलं तेव्हा कोणत्या विषयावर बोलायच किंवा नाही असं सांगितलं नव्हतं. जर तसे असते तर मी त्या कार्यक्रमाला गेलोच नसतो. जो काही प्रकार घडला त्यानंतर मला अस्वस्थ वाटू लागलं आहे. यामागे असलेली शक्ती आपली मुस्कटदाबी करीत आहे, हे मला मान्य नाही. अशा सेन्सॉरला माझा विरोध आहे. अशा घटना २०१४च्या आगोदरही घडत होत्या. मात्र, आता त्याचे प्रमाण वाढले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तीन महिला सहगल यांचा मुखवटा घालून निमूट बसल्या होत्या. त्यांना मंडपातून बाहेर काढले गेले मात्र, त्यावर व्यासपीठावरील कोणीही काहीही बोलले नाही. यातून काय चाललंय, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. पालेकर पुढे म्हणाले, माझे भाषण रोखण्याच्या घटनेला चोवीस तास झाले तरी त्यावर कोणीही बोलले नाही. हे अंधकारमय परिस्थितीचे उदाहरण आहे. या कार्यक्रमात काही तरुणांनी माझी भेट घेऊन तुम्ही योग्य बोलल्याचे म्हटले आहे. तसेच सरकारविरोधात बोलणार्यांना परवानगी द्यायची की नाही, हे आता दिल्लीतील बाबू ठरवणार का? का अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.