राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेच्या माध्यमातून विकासाची कामे केली असताना केवळ श्रेयासाठी स्वत: काम केल्याचा देखावा भाजपचे पुढारी करत आहे. त्यांना केवळ प्रसिद्धीचा हव्यास आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना केली.

दिघी-बोपखेल प्रभागातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना वाघेरे म्हणाले, दिघी-बोपखेलसह शहरातील ग्रामीण भागाचा विकास राष्ट्रवादीमुळे झाला आहे. बोपखेल-खडकीच्या प्रस्तावित नवीन रस्त्यासाठी पालिकेने ४२ कोटींची तरतूद केली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर या कामाची सुरुवात होईल. मात्र, केवळ आयते श्रेय व प्रसिद्धीसाठी भाजपकडून आटापिटा सुरू आहे.

चुकीची माहिती देऊन पेपरबाजी केली जात आहे. भरीव विकासकामांमुळे शहराला ‘बेस्ट सिटी’ म्हणून पुरस्कार मिळाला. भाजप सरकारने राजकारण केल्यामुळेच ‘स्मार्ट सिटी’त शहराची निवड होऊ शकली नाही, अशी टीका त्यांनी केली. या प्रसंगी नगरसेवक चंद्रकांत वाळके, आशा सुपे, संजय काटे, माजी नगरसेवक भाऊसाहेब सुपे आदी उपस्थित होते.