विश्वस्त मंडळाच्या बैठकीत निर्णय, आजपासून अंमलबजावणी पिंपरी : आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर यापुढे अभिषेक आणि महापूजा होणार नाहीत, त्याऐवजी माउलींच्या पादुकांचे पूजन केले जाणार आहे. समाधीची होत असलेली झीज आणि भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन देवस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारपासून (२७ डिसेंबर) करण्यात येणार आहे. या बदलास होत असलेला विरोध पाहता देवस्थानने पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. माउलींच्या ऐतिहासिक संजीवन समाधीचे चिरकाल व चिरंतन जतन, संवर्धन करण्यासाठी समाधीवरील अभिषेक आणि महापूजांची संख्या मर्यादित करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने यापुढे समाधीऐवजी पादुकांचे पूजन केले जाईल. अशाप्रकारे बदल करण्याचा निर्णय आळंदी देवस्थान विश्वस्तांच्या बैठकीत घेण्यात आल्याचे गुरुवारी सांगण्यात आले. अभिषेक करताना वापरण्यात येणाऱ्या विविध साहित्यामुळे संजीवन समाधीची झीज होत असल्याचा निष्कर्ष काढला असून तसा अहवाल पुरातत्त्व विभागानेही दिला असल्याचे विश्वस्तांकडून सांगण्यात आले. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारपासून (२७ डिसेंबर) करण्यात येणार आहे. या बदलास विरोध सुरू झाल्याने देवस्थानने पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे. तसे विनंतीपत्र देवस्थानचे मुख्य विश्वस्त अॅड. विकास ढगे पाटील यांनी पोलिसांना दिले आहे. वारकऱ्यांच्या तक्रारी, सीसीटीव्हीतील गर्दीची दृश्ये, दर्शनाची लांबवर लागणारी रांग, भाविकांची गैरसोय असे विविध मुद्दे लक्षात घेऊन देवस्थानने पूजा आणि अभिषेक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. माउलींच्या संजीवन समाधीचे चिरकाल जतन झाले पाहिजे, ही त्यामागची मुख्य भूमिका आहे. पूजा, अभिषेकाऐवजी माउलींच्या चलपादुकांवर पूजा करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. संस्थानचा हा निर्णय असला, तरी ही वारकऱ्यांचीही भूमिका आहे. - अॅड. विकास ढगे पाटील, मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान