शरद पवार यांच्यावर माझी प्रचंड निष्ठा आणि विश्वास आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पुण्यात एका कार्यक्रमातील जाहीर मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आणि इतर विषयांवर त्यांनी यावेळी सडेतोड भुमिका मांडली.

राऊत म्हणाले, शरद पवारांनी पाहिल्या दिवसापासून आम्हाला सांगितले की, आपण हे करू शकतो काही नवीन घडवू शकतो. हे सरकार बनवयाचे, टिकवायचे तसेच चालवायचे असे शरद पवार यांनी आम्हाला सांगितले आहे. त्यामुळे आम्ही हे सरकार पाच वर्ष चालवणारच. शरद पवार हे ठाकरे सरकारच्या पाठिशी ठामपणे उभे आहे. त्यामुळे शरद पवारांवर माझी प्रचंड निष्ठा आणि विश्वास आहे.

“शरद पवारांना मी मानतो कारण त्यांनी अनेक वर्षे लोकांसाठी काम केलं आहे. शरद पवार हे ‘जाणते राजे’ आहेत आणि राहणार त्यांना लोकांनी ही पदवी दिली आहे,” अशा शब्दांत त्यांनी उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता प्रत्युत्तर दिले आहे. “शरद पवारांची कामाची पद्धत मला माहिती आहे. रिमोट कन्ट्रोलद्वारे ते राज्य चालवत नाहीत. सरकारमध्ये जे चांगल आहे ते सांगतात आणि चुकीचं आहे त्याला विरोधही करतात,” अशा शब्दांत त्यांनी शरद पवारांचे कार्यपद्धतीचे कौतूक केले.

लोकशाही बळकट करायची असल्यास विरोधी पक्ष सक्षम राहिला पाहिजे

देशाची लोकशाही बळकट करायची असल्यास विरोधी पक्ष सक्षम राहिला पाहिजे. यासाठी सत्ताधारी पक्षाने विरोधकांना बळ देण्याची आवश्यकता आहे. राज्यात १०५ आमदारांचा विरोधी पक्ष आहे. त्या सर्वांनी या सरकारला किमान वर्षभर काम करण्याची संधी द्यावी, अशी अपेक्षाही यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केली.