पहिल्या टप्प्यात हॉटेल, मॉलमधील थकबाकीदारांकडून वसुली मिळकतकराची कोटय़वधी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी थकबाकीदारांच्या घरापुढे बॅण्डबाजा वाजविण्यात येणार आहे. गणेशोत्सवात म्हणजे गुरुवारपासूनच (८ सप्टेंबर) बॅण्डबाजा पथक कार्यान्वित होणार आहे. पहिल्या टप्प्यात हॉटेल तसेच मॉलची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्यासमोर बॅण्ड वाजवण्यात येईल. नोंदणी न झालेल्या मिळकतींसाठी ‘अभय योजना’ राबहूनही त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नोंदणी न झालेल्या मिळकतींना तिप्पट दराने दंड आकारण्याचा निर्णयही कर आकारणी आणि करसंकलन विभागाने घेतला आहे. त्यासाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली असून नोंदणी न झालेल्या मिळकतींचा शोध घेण्यात येणार आहे. थकबाकी वसुलीसाठी यापूर्वी प्रशासनाकडून बॅण्डबाजा पथक सुरू करण्यात आले होते. थकबाकीदाराच्या घरापुढे बॅण्डबाजा वाजविण्यात येत असल्यामुळे थकबाकी वसूल होण्यास मदत झाली होती. मात्र पुढे ही मोहीम थांबली. ऑगस्ट महिन्यापासून वापरात बदल झालेल्या आणि कर आकारणी न झालेल्या मिळकतींसाठी अभय योजना सुरू करण्यात आली. या योजनेला प्रतिसाद मिळून उत्पन्नात वाढ होईल, अशी प्रशासनाला अपेक्षा होती. मात्र नागरिकांनी या योजनेकडे पाठ फिरवली. त्यामुळे आता कर आकारणी न झालेल्या मिळकतींना तिप्पट दंड लावण्याचा निर्णय कर आकारणी आणि करसंकलन विभागाने घेतला आहे. त्यासाठी स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली असून शहराबरोबरच उपनगराच्या भागातील नोंदणी न झालेल्या मिळकती शोधून काढण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त सुहास मापारी यांनी दिली. शहरातील तब्बल दीड लाख मिळकतदारांकडे १५०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. मिळकत करातून मिळणाऱ्या उत्पन्नात गेल्या वर्षी वाढ झाली असली तरी थकबाकीदारांची वाढती संख्या, मिळकतींची आकारणी म्हणजे मूल्यांकन (असेसमेंट) न झालेल्या मिळकतींची वाढती संख्या, वापरामध्ये बदल झालेल्या मिळकतींमुळे बुडत असलेला महसूल अशा बाबींना या विभागाला सामोरे जावे लागत आहे. कोंढवा-वानवडी येथील खासगी मिळकती, हॉटेल, शोरूम, व्यावयासिक कार्यालये, रेस्टॉरंट आणि बार यांच्यावर बुधवारी कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून तीन पटदराने दंडाची आकारणी करण्यात आली.