विजेबाबत सतर्क राहण्याचे नागरिकांना आवाहन; यंत्रणेची मान्सूनपूर्व देखभाल, दुरुस्तीची कामे पूर्ण; अपघाताच्या शक्यतेची माहिती महावितरणला कळवा

वीज यंत्रणेबाबत पावसाळ्यात निर्माण होणारा संभाव्य धोका व अपघात लक्षात घेता महावितरण कंपनीकडून मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली असून, पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांनी वीज यंत्रणा व घरातील विजेच्या उपकरणांबाबत विशेष दक्षता बागळणे गरजेचे आहे. अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्कीटमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या तसेच घरगुती वीजयंत्रणा किंवा उपकरणांपासून सावधानता बाळगावी. त्याचप्रमाणे अपघाताची शक्यता असलेल्या भागाची माहिती तातडीने कळवावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

पावसात यंत्रणेला होणारा धोका लक्षात घेता मागील काही दिवसांपूर्वीच यंत्रणेची कामे पूर्ण करण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. यात विजेच्या तारांवर पडू शकणाऱ्या झाडाच्या फांद्या छाटणे, वाकलेले वीजखांब सरळ करणे, धोकादायक वीजतारा बदलणे, त्या भूमिगत करणे, फीडर पिलर, ट्रान्सफार्मस आदींच्या देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात आली असून, यंत्रणा  पावसाळ्यासाठी सज्ज असल्याचे सांगण्यात आले. अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेली विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यामुळे झाडाच्या मोठय़ा फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये.

शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी २४ तास सुरू असणाऱ्या कॉल सेंटर्सचे १८००-२००-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे दोन टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाइलद्वारे या क्रमांकावर वीजग्राहकांना तक्रार दाखल करता येणार आहे. वीजसेवेच्या तक्रारींसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीज पुरवठय़ात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणांची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देण्याची सोय उपलब्ध आहे. पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र आणि वीजपुरवठा बंद करण्यात येतो. अशा स्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विजेबाबत पावसाळ्यात काय काळजी घ्याल

  • पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
  • घरातील वीजपुरवठय़ाला आवश्यक अìथग केल्याची खात्री करून घ्यावी.
  • घरात शॉर्टसíकट झाल्यास मेन स्वीच तत्काळ बंद करावा.
  • घरावरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ‍ॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे.
  • ओल्या कपडय़ांवर विजेची इस्त्री फिरवू नये.
  • विजेचे स्वीच बोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.
  • विजेवर चालणारी सर्व उपकरणे स्वीच बोर्डापासून बंद करावीत.
  • टिनपत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
  • विजेच्या खाबांना जनावरे बांधू नयेत, त्यास दुचाकी टेकवून ठेवू नयेत किंवा विद्युत खांबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत.