प्रस्तावित हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान होणाऱ्या मेट्रोच्या कामात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील पूल अडचणीचा ठरला आहे. त्यामुळे सर्व तयारीनंतर हा पूल पाडण्यास आजपासून (दि.१४) सुरुवात झाली आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आजपासून पुढील दहा दिवस शहरात कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. तर शहरातील प्रत्येक चौकात पोलीस नागरिकांची कसून तपासणी करीत आहेत. शहरात लॉकडाउन सुरु असला तरी विकासकामं मात्र थांबवण्यात येणार नाहीत. त्यामुळे पुणे शहरातील स्वारगेट-पिंपरी मेट्रो, वनाज-वाघोली मेट्रो ही काम सुरुच आहेत. त्याचबरोबर पीएमआरडीएमार्फत उभारण्यात येणाऱ्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या कामालाही सुरुवात होणार आहे. मात्र, त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील महापालिकेने बांधलेले दोन उड्डाणपूल मेट्रोच्या कामात अडचणीचे ठरले आहेत. त्यामुळे महापालिका आणि राज्य सरकाराच्या परवानगीनंतर आजपासून हे पूल पाडण्यास सुरुवात झाली आहे. एकाचवेळी हे पूल पाडता येणार नसल्याने तीन टप्प्यात ते पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रथम चतुःशृंगी येथील पूल त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात बाणेरकडे जाणारा आणि तिसऱ्या टप्प्यात औंधकडे जाणारा पूल पाडण्यात येणार आहे.