पुणे, बारामती, औरंगाबाद, संगमनेरसह कोकणात शनिवारी पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह सोसाट्याचा वारा देखील सुटला होता. पुण्यासह पिंपरी-चिचवड भागात दिवसभर कमालीचे उकड्याल्यानंतर सायंकाळी ढगांच्या गडगडाटांसह व विजांच्या कडकडाटांसह काही वेळ पावसाने हजेरी लावली.पावसाच्या या शिडकाव्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांना हायसे वाटले. या अगोदर उत्तर महाराष्ट्रात हवामान खात्याकडून गारपीटीचा इशारा देखील देण्यात आला होता. १४ जून पर्यंत मान्सून कोकणात दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर राज्यातील उर्वरीत भागात मान्सूनचे आगमन लांबण्याची शक्यता आहे. एकुणच १५ जूनपर्यंत तरी राज्यात मान्सूनचे आगमन होणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सूनपुर्व पावसात सातत्य नसल्याने शेतक-यांनी या पावसाच्या भरवशावर पेरणीची सुरूवात करू नये, असे देखील तज्ज्ञांनी सांगितले आहे. याशिवाय ११ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे तापमान हे अधिक राहणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे.