गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यासह विदर्भात दुष्काळाची भीषण स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मुळातच वारकरी हादेखील शेतकरी असल्याने आता वारीला निघालेल्या वारकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी तुकोबांच्या चरणी दुष्काळ दूर करा अशी प्रार्थना केली आहे. राज्यभरासह मराठवाडा येथील दरवर्षी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला हजारो शेतकरी येत असतात. दुष्काळी परिस्थिती कायस्वरूपी निघून जावी असे साकडे संत तुकाराम महाराज यांच्या चरणी मराठवाड्यातून आलेल्या वारकऱ्यांची घातले आहे.

गेल्या काही वर्षांपासून लातूर, बीड, उस्मानाबाद तसेच विदर्भात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ आहे. या दुष्काळाचा फटका तेथील शेतकऱ्यांसह जनावरांना बसल्याच अवघ्या महाराष्ट्र राज्य पाहत आहे. राज्यकर्ते मात्र राजकारण करण्यापलीकडे काहीच करताना दिसत नाहीत. दुष्काळग्रस्त ग्रामीण भागातील तरुण तरुणी पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरात येऊन पोट भरण्यासाठी नोकरी शोधत आहेत. त्यामुळे गावच्या गावं ओस पडलेली आहेत. मान्सून राज्यभर दाखल झालेला असला तरी तो कधी हुलकावणी देईल याचा भरवसा नाही.

त्यामुळेच अनेक वारकरी हे देहूनगरीत दाखल झाले असून ते संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या चरणी गाऱ्हाणे मांडत आहेत. ग्रामीण भागात अत्यंत भयावह परिस्थिती असून आठवड्यातून एक वेळेस पिण्याचे पाणी मिळण्याचीही भ्रांत आहे. तर जनावरांची देखील परवड होत आहे. यावेळी तरी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडू दे आणि शेतकरी सुखी समाधानी होऊ दे अशी प्रार्थना यावेळी वारकऱ्यांनी केली.