पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारीची कंटेनरला धडक बसून झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण जखमी आहेत. जखमींना निगडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यामधील दोघांची प्रकृती गंभीर आहे.  लक्ष्मी नारायण चौगुले (वय ४५), यतीन नारायण चौगुले (वय ३४, रा. ऐरोली, साईनाथवाडी, ठाणे) आणि तेजल सुहास जगताप
( येरवडा) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. राधा रामदास दारके , संतोष सुदाम भेगडे , करण बापुराव जाधव , नाथा तुकाराम नरे , मयूर मधुकर वाघमारे  आणि सुहास शिवाजी जगताप हे जखमी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मळवली पूल ओलांडल्यानंतर दुपारी एकच्या सुमारास मोटारीचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरवर जाऊन आदळली. यामध्ये तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.