अयोध्येत भव्यदिव्य असं राम मंदिर उभारलं जाणार आहे. त्याचं ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केलं जाणार असून या कार्यक्रमासाठी देशभरातील १५० जणांना निमंत्रण दिलं जाणार आहे. त्यासाठी कोणाला निमंत्रण द्यायचं याची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले पाहिजे, अशी भूमिका राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त श्री गोविंदगिरी महाराज यांनी मांडली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गोविंदगिरी महाराज म्हणाले, “शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी अनेकवेळा भूमिका मांडली आहे. त्यांचे कार्य यामध्ये खूप मोठे असल्याने आणि त्यांचा वारसा पुढे घेऊन जाणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले पाहिजे. तसेच या भूमिपूजनामध्ये प्रत्येकाने घरी किंवा मंदिरात जाऊन पूजा करून सहभागी व्हावे” दरम्यान, फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

आणखी वाचा- काहींना मोदींचं नाव घेताच पोटात दुखायला लागतं; आचार्य किशोरजी व्यास यांचा शरद पवारांना टोला

सोनपुरा कुटुंब आणि एलअँडटी करणार मंदिराची उभारणी

गोविंदगिरी महाराज म्हणाले, राम मंदिराची उभारणी गुजरातमधली सोनपुरा कुटुंब करणार आहे. याच कुटुंबानं प्रसिद्ध सोमनाथचं मंदिर, अंबाजींचं मंदिर बांधलं आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या स्वामीनारायण मंदिराची उभारणी देखील त्यांनी केली आहे. लार्सन अॅण्ड टुब्रो (एलअँडटी) कंपनी त्यांच्यासोबत सहकार्य करुन या मंदिराची उभारणी करणार आहे.

आणखी वाचा- “राम मंदिर भूमिपूजनापूर्वी बाबरी कटाचा खटलाच बरखास्त केला तर शहीद झालेल्यांना मानवंदना ठरेल”

१६१ फूट उंचीचं मंदिर

राम मंदिराची उंची ठरल्याप्रमाणे १६१ फूट असणार आहे. हे मंदिर दोन मजली असेल या दोन मजल्यांच्यावर मंदिराचा शिखर असेल. संसद भवन ज्या प्रकारे एका उंच पायावर उभारण्यात आलं आहे तशाच पद्धतीने उंच पाया घेऊन त्यानवर १६१ फूटांचं मंदराचं बांधकाम होणार आहे. अशोक सिंघल यांच्या उपस्थितीत सर्व चर्चा करुन सर्व प्रमुख संतांनी मिळून जो आराखडा ठरवला होता. तेच प्रारुप आबाधित ठेवलं आहे, त्यात शक्य तेवढी भव्यता आणावी यासाठी त्यात २० फूट उंची वाढवून एक मजला वाढवण्यात आला आहे. तसेच अधिक तीन शिखरं करण्याची योजना होती ती आता पाच शिखरांची झाली आहे, असंही यावेळी गोविंदगिरी महाराजांनी सांगितलं.