शिक्षकनगरमधील सहकारी गृहरचना संस्थेच्या जागेत भाजप नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे या अनधिकृतपणे पिठाची गिरणी चालवत असल्याचा आरोप या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. संस्थेला या जागेत बांधकाम करायचे असून सहस्रबुद्धे जागेचा ताबा सोडत नसल्यामुळे ते अडले असल्याची माहिती संस्थेचे कार्यवाह पु. के. कुलकर्णी व अध्यक्ष वि. पु. जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पौड रस्त्यावरील ‘शिक्षकनगर गृहरचना संस्था मर्यादित’ ही ९६ शिक्षकांची सोसायटी आहे. या सोसायटीच्या मालकीच्या जागेत सभागृह आणि सोसायटीचे कार्यालय करण्यासाठी २००७ मध्ये नवीन सभागृहाचे नकाशे पालिकेकडून सोसायटीला मंजूर करुन मिळाले. ११ हजार चौरस फुटांची ही जागा आहे. या जागेतील एका जुन्या गॅरेजमध्ये २०० चौरस फूट जागेवर सहस्रबुद्धे यांची पिठाची गिरणी आहे. ‘लिव्ह अँड लायसन्स’ करार करुन ही गिरणी चालवली जात होती. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘२००७ मध्ये पालिकेने सभागृहाचे नकाशे मंजूर केले. त्यानंतर सहस्रबुद्धे यांच्याबरोबर नवीन करार केले गेले नाहीत. सोसायटीने २०१४ मध्ये सहस्रबुद्धे यांना जागा खाली करण्याबद्दल नोटीस दिली. सभागृहाचे बांधकाम सोसायटी स्वत:च करणार असल्यामुळे या बांधकामाचा खर्च उभा करण्यासाठी वेळ गेला. सोसायटीचे काम सुरू झाल्यावर आपण जागा खाली करुन देऊ, असे सहस्रबुद्धे यांनी सांगितले होते. ते सोसायटीने मान्य केले. त्यानंतर २०११ मध्ये पालिकेने मंजूर नकाशा पुनर्मान्य करुन दिला. दरम्यान सोसायटीने खर्चाची तजवीज केली. तीन महिन्यांपूर्वी काम सुरू झाले. सहस्रबुद्धे यांनी जागा खाली करुन द्यावी अशी नोटीस सोसायटीने वकिलामार्फत पाठवून संस्थेने खोदकाम सुरू केले. परंतु सहस्रबुद्धे यांनी ताबा सोडण्यास नकार देऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना ‘बघून घेऊ’ अशा प्रकारची भाषा वापरत दांडगाई सुरू केली, असा आरोपही संस्थेने केला आहे. सहस्रबुद्धे यांना जागेचा ताबा सोडण्यास सांगावे आणि सोसायटीचे काम पुन्हा सुरू करता यावे, असे निवेदन संस्थेने आयुक्त आणि नगर अभियंता यांना पाठवले आहे. ‘‘महापालिकेच्या मान्यताप्राप्त नकाशाप्रमाणेच आम्ही काम करत आहोत. सहस्रबुद्धे या नगरसेवकपदाचा दबाव निर्माण करुन गिरणीची जागा सोडत नसल्यामुळे आमचे काम विस्कळीत झाले असून आर्थिक नुकसान देखील होत आहे. २३ मार्च रोजी आमचा बांधकामाचा परवाना अचानक रद्द करण्यात आला होता. पालिकेच्या बांधकाम विभागाकडून याबद्दल मिळालेल्या पत्रात माधुरी सहस्रबुद्धे यांच्या तक्रारीनुसार काम बंद ठेवण्यास सांगितल्याचा उल्लेख आहे. ६ एप्रिलला हा परवाना आम्ही परत मिळवला आहे. सहस्रबुद्धे या सोसायटीच्या भाडेकरु नाहीत. मात्र २००७ नंतर त्यांनी शिक्षकनगरला देणग्या दिल्या होत्या. आम्ही त्यांना ऑगस्ट २०१४ मध्ये जागा खाली करण्यासाठी पहिली नोटीस पाठवली असून मार्च २०१५ मध्ये दुसरी नोटीस पाठवली आहे.’’ पु. के. कुलकर्णी, कार्यवाह, शिक्षकनगर सह. गृह. संस्था ‘‘गेली २५ वर्षे मी या ठिकाणी नियमितपणे गिरणी चालवत असून सोसायटीचे सभासद व पदाधिकारीही पीठ दळायला आमच्या गिरणीत येतात. २००७ नंतरही संस्थेने माझ्याकडून भाडे स्वीकारले आहे. २०१४ सालापर्यंत संस्थेने भाडे घेतल्याच्या पावत्याही माझ्याकडे आहेत. जवळपास महिन्यापूर्वी संस्थेने मला प्रथम जागा खाली करण्याबद्दल कळवले. आपल्याला गिरणी हवी असल्याचे सांगणारे सोसायटीच्या सभासदांच्या सह्य़ांचे पत्रही माझ्याकडे आहे. मी नगरसेविका असल्यामुळे माझी बदनामी केली जात आहे. संस्थेची बाजू न्याय्य असेल तर ते न्यायालयात जाऊन तसा आदेश का आणत नाहीत? तसे झाल्यास मी जागा खाली करण्यास तयार आहे.’’ नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे