अद्यादेश काढण्याचे परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांचे आश्वासन प्रवासी व माल वाहतुकीतील वाहनांचे वाढविलेले परवाना नूतनीकरण शुल्क कमी करण्याबाबत अध्यादेश येत्या पाच ते सहा दिवसांत काढण्यात येणार असल्याचे आश्वासन परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांनी वाहतूकदारांना दिले आहे. त्यामुळे राज्यभरातील पंधरा लाखांहून अधिक वाहतूकदारांना दिलासा मिळणार आहे. त्याचप्रमाणे पुणे शहरात ग्रामीण भागातील रिक्षा चालकांना रिक्षा परवाने दिले जाणार आहेत.महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली.प्रवासी व माल वाहतुकीतील वाहनांचे परवाना नूतनीकरण शुल्क तसेच दंडाची रक्कम राज्य शासनाने १० फेब्रुवारीपासून मोठय़ा प्रमाणावर वाढविली होती. या निर्णयामुळे राज्यभरातील वाहतूकदारांनी आंदोलन करून बंदचा निर्णय घेतला होता. त्यामुळे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी वाहतूकदारांची बैठक घेऊन शुल्क व दंडाची रक्कम काही प्रमाणात कमी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, निर्णय होऊन दोन महिने उलटले, तरी अध्यादेश न निघाल्याने अद्यापही वाढीव पद्धतीने शुल्क व दंड घेतला जात आहे. यासंबंधी अधिकाऱ्यांनी पुढील पाच ते सहा दिवसांत अध्यादेश काढण्याचे आश्वासन दिले आहे.