नव्य वर्षांमध्ये महावितरण कंपनीमध्ये पुन्हा २७०० पदांची भरती केली जाणार आहे. वीज कंपनीची पुनर्रचना झाल्यापासून म्हणजेच २००५ पासून ‘महावितरण’ने केलेल्या विविध भरतींमधून सुमारे २५ हजार जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. विद्युत सहायकापासून मुख्य अभियंत्यांपर्यंतच्या पदांचा त्यात समावेश आहे.
वीज कंपनीच्या पुनर्रचनेपूर्वी भरतीवर बंदी होती. कंपनीची पुनर्रचना झाल्यानंतर भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत विविध पदे भरण्यात आली. भरती करण्यात आलेल्यांमध्ये सर्वात जास्त विद्युत सहायकांची संख्या आहे. ‘महावितरण’ने ही सात हजार पदे भरली आहेत. या शिवाय कनिष्ठ यंत्रचालक ३०००, कनिष्ठ तंत्रज्ञ २७००, कनिष्ठ अभियंता २५००, दुय्यम अभियंता ११३०, लेखा सहायक ८००, कनिष्ठ सहायक ७०० ही पदे भरण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता सहायक अभियंता या शिवाय मनुष्यबळ, माहिती तंत्रज्ञान, कामगार, स्थापत्य आदी विभागातील विविध पदांचा त्यात समावेश आहे.
नव्या वर्षांमध्ये आणखी २७०० पदे भरण्यात येणार आहेत. त्यातील कनिष्ठ सहायकांच्या ७०० पदांबाबत भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यभरात नव्याने अनेक वीज उपकेंद्र उभारण्यात आलेली आहेत. या उपकेंद्रांसाठी उपकेंद्र सहायकांची दोन हजार पदे भरली जाणार आहेत. त्याची भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे, असे ‘महावितरण’कडून कळविण्यात आले आहे.