पुण्यात बुधवारी रात्री पावसाने अक्षरक्षः तांडव घातले. रात्रभर सुरू असलेल्या पावसाने पुणे शहरातील अनेक वस्त्या आणि नागरी वसाहतींना पाण्याचा तडाखा बसला. सिंहगड, धनकवडी, सहकारनगर, कात्रज या भागातील सोसायट्या आणि घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. तर मनुष्यहानीसह जनावरंही दगावली आहे. पावसामुळे अरण्येश्वर परिसरातून जाणाऱ्या आंबील नाल्याने रौद्रावतार घेतला. नाल्याचे पाणी टांगेवाला काॅलनीत शिरल्याने एका घराची भिंत कोसळली. यात 5 जण ठार झाले आहेत. गुरूवारी दुपारपर्यंत मृतांचा आकडा वाढून 11 झाला आहे. दरम्यान, आणखी काहीजण बेपत्ता आहेत.

परतीच्या पावसाने मंगळवारी रात्रीपासून पुण्यात मुक्काम ठोकला आहे. शहरात सलग दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा जोर बुधवारी रात्रीपासून वाढला. पावसाची संततधार कायम राहिल्याने शहरातील अनेक भागात पाणी तुंबायला सुरूवात झाली. मध्यरात्री मुसळधार पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर रस्त्यांना ओढ्या-नाल्यांना नद्यांचे स्वरूप आले. मुसळधार पावसामुळे आंबील ओढ्याला पूर आल्याने कात्रजपासून ते दांडेकर पुलापर्यंत काठांवरील वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे सहकार नगर मधील अरण्येश्वर परिसरातील टांगेवाली कॉलनी येथील भिंत कोसळली. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. तर पाच जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरातील सोसायट्या, घरे आणि वसाहतीमध्ये पाणी शिरल्यामुळे बचाव पथकांकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

टांगेवाली कॉलनी परिसरात भिंत कोसळून पाच जण मरण पावले. त्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. त्यातील चौघांची ओळख पटली आहे. रोहित भरत आमले (वय 13) संतोष कदम (वय 55) सौ सौंदलीकर (वय 32) आणि त्यांचा 9 वर्षाचा मुलाचा या घटनेत मृत्यू झाला आहे. तर अन्य पाच जण वाहून गेले आहेत. गुरूवारी सकाळी आणखी दोन मृतदेह सापडले असून, मृतांचा आकडा सातवर गेला आहे. त्यांची माहिती कळू शकली ऩाही. तर दत्तवाडी भागात नाल्याच्या पुराचा जनावरांनाही फटका बसला आहे. नाल्याजवळ असलेल्या गोठ्यात आठ गाई आणि म्हशी दगावल्या आहेत.