नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गात अपघाताचे सत्र सुरू आहे. सोमवारी ( २३ मे) पीएमपी बसच्या धडकेने गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

श्रीराम अताराम उसेंडी (वय ४०, रा. मागदा, ता. अरमोरी, जि. गडचिरोली ) असे उपचारादरम्यान मरण पावलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पीएमपी बसचालक मयूर माधव येनपुरे (वय ३०, रा. शास्त्रीनगर, येरवडा) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार सुनील जाधव यांनी यासंदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीराम उसेंडी हे कामानिमित्त पुण्यात आले होते. सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास येरवडा येथील वाडिया बंगल्यासमोर बीआरटी मार्गातून निघालेले श्रीराम यांना पीएमपी बसने धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर बसचालक पसार झाला. पोलिसांनी श्रीराम यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान श्रीराम यांचा गुरुवारी ( २६ मे) मृत्यू झाला.

लष्कर परिसरात पादचाऱ्याच्या मृत्यू

लष्कर परिसरात मोटार मागे घेत असताना धडक बसल्याने पादचारी मृत्युमुखी पडला. गुरुवारी ( २६ मे) सायंकाळी ही घटना घडली. शंकर मारुती चव्हाण (वय ४०, रा. काळेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी मोटारचालक विजय रामगोपाल मिस्त्री (वय ५२, सोलापूर बाजार, लष्कर) यांना पोलिसांनी अटक केली. मिस्त्री यांच्याकडे चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना नाही. मिस्त्री हे मोटार मागे घेत असताना तेथून निघालेले चव्हाण हे मागील चाकाखाली सापडले. गंभीर जखमी झालेल्या चव्हाण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.