सहा महिने ते दोन वर्षांचा कालावधी; शासकीय नोकऱ्यांत प्राधान्य पुणे : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाकडून ३२० अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमातील दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या (एमएसबीटीई) पदविका अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश मिळेल. मंडळाचे अध्यक्ष ए. एम. जाधव यांनी या संदर्भातील माहिती दिली. कौशल्य विकास मंडळाकडून सहा महिने कालावधीचे एकूण १६७, तर एक वर्ष कालावधीचे १०७ अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे दोन वर्षे कालावधीचे अर्धवेळ आणि पूर्णवेळ असे एकूण ४६ अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कौशल्य मंडळाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय विभागातील नोकरीमध्ये प्राधान्य दिले जाते. त्यासाठी या अभ्यासक्रमांना शासनाकडून समकक्षता देण्यात आली आहे. तसेच कौशल्याधिष्ठित आणि नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांना स्वत:चा व्यवसायही सुरू करता येतो, असेही जाधव यांनी नमूद केले. अभ्यासक्रमांची आणि प्रवेश प्रक्रियेची माहिती www.msbsd.edu.in संकेतस्थळावर देण्यात आली आहे. महत्त्व काय?.या अभ्यासक्रमांचे शुल्क कमी असल्याने विद्यार्थ्यांना कमी खर्चात कौशल्याधिष्ठित शिक्षण घेता येते. संगणक, निमवैद्यकीय, इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल, स्थापत्य अभियांत्रिकी, वाहन, रसायन, कृषी अशा शाखांमध्ये विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक अर्हतेवर अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येत असल्याने शहरी आणि ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल घटकांमधील अनेक विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. दहावीच्या निकालात वाढ झाल्याने या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.