राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो, असे म्हटले जात असले, तरी महायुतीतील तीन पक्ष हे कधी मित्रासारखे, तर कधी विरोधकांसारखे वागत असल्याने पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस भांबावल्यासारख्या स्थितीत आहे. एकेक प्रमुख पदाधिकारी कोणत्या तरी पेचात सापडत असल्याने पक्षाच्या प्रतिमेला तडा जात असताना प्रतिमा आणखी मलीन कशी होईल, याची संधी मित्रपक्षही सोडायला तयार नसल्याने ‘राष्ट्रवादी’ला मित्र कोण अन् विरोधक कोण, हेच उमजेनासे झाले आहे.

गुन्ह्यात नाव आले, की विरोधी पक्षांपेक्षा मित्रपक्षच प्रतिमा डागाळण्यासाठी एक पाऊल पुढे येत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. कधी उघडपणे, तर कधी पडद्यामागे राहून भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्ष ‘राष्ट्रवादी’ची प्रतिमा मलीन करण्याची पुरेपूर संधी घेत असल्याचे यापूर्वी घडलेल्या घटनांवरून स्पष्ट होते.

गेल्या वर्षी कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणात माजी आमदार सुनील टिंगरे यांंचे नाव येताच मित्रपक्ष भाजप पडद्यामागून राहून सूत्र हलविण्याचे काम करत राहिल्याचे बोलले जाते. त्यामागे अर्थातच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक होती. या मतदारसंंघावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबरच भाजपनेही दावा केला होता. त्यामुळे या प्रकरणावरून टिंगरे यांना अप्रत्यक्ष लक्ष्य करण्याचे भाजपने सोडले नाही. तरीही, टिंगरे यांना उमेदवारी मिळाली; पण या प्रकरणावरून झालेला प्रचार त्यांना भोवला आणि पराभव पत्करावा लागला. भाजपने डाव साधला; पण त्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा फायदा होऊन बापू पठारे निवडून आले.

शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे नाव एका प्रकरणात आले. पक्षाला फटका बसू नये म्हणून त्यांनी पदाचा राजीनामा दिला. आता त्या प्रकरणात त्यांना अटकपूर्व जामीनही मंजूर झाला आहे. मात्र, पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसलाच. आता शहराध्यक्षविना पक्षाचा कारभार सुरू आहे.सध्या राज्यात चर्चेत असलेल्या वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा मुळशीचा माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे याला अटक झाली. त्याने २००४ मध्ये तत्कालीन एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुळशी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्याच्याशी असलेल्या राजकीय संबंधांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विरोधकांनी लक्ष्य केले. पण, हगवणे कुटुंबाचे कारनामे चव्हाट्यावर येत असताना अजित पवारांची राष्ट्रवादी कशी आहे, हे दाखविण्यासाठी भाजप आणि शिवसेनाही (शिंदे) अप्रत्यक्षपणे पुढे असल्याचे चित्र निर्माण झाले.

या प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि त्याच्या मुलाला अटक करण्यात आल्यावर भाजपच्या महिला आघाडीने शिवाजीनगर न्यायालयाबाहेर आंदोलन केले. आंदोलनामागील भूमिका स्पष्ट असली, तरी आंदोलन करून मित्रपक्षानेच ‘राष्ट्रवादी’ला खिंडीत पडकले. शिवसेना (शिंदे) पक्षाने पिंपरी-चिंचवडमध्ये आंदोलन करून लक्ष वेधले.

विरोधक संधी शोधत आहेत, तर मित्रपक्ष मिळालेली संधी सोडायला तयार नाहीत. त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पेचात आहे. पक्षाला प्रतिमा जपणे कठीण होत चालले आहे. हे आरोपांचे डाग पुसण्याचे आव्हान त्यांच्यापुढे उभे राहिले आहे.

महापालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांवर जमीन व्यवहारातील घोटाळे, महिलांवरील अत्याचार, गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध अशा प्रकारचे गंभीर आरोप होत आहेत. त्यामुळे हा पक्ष सध्या संक्रमणावस्थेतून जात आहे. भाजपच्या वाढत्या प्रभावाला तोंड देत या पक्षाला उभे राहावे लागणार आहे.

एके काळी पुण्याच्या राजकारणावर आणि महापालिकेवर अंमल गाजवणाऱ्या या पक्षाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. २०१७ च्या निवडणुकीत एकसंध असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ३९ नगरसेवक निवडून आले होते. आता दुभंंगलेल्या पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे धडपड करत असताना पदाधिकारी अडचणीत येत आहेत. परिणामी, दादांची अडचण होत आहे. आगामी महापालिका निवडणुकीत ‘प्रचंड आशावादी’ असलेल्या या पक्षाला मित्र कोण आणि विरोधक कोण, याचे कोडे उलगडायला तयार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sujit.tambade@expressindia.com