बारामती : राज्यात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात दोन वर्षांसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. या तंत्रज्ञानाचा फायदा आणि गरज पाहता एका आर्थिक वर्षासाठी हा निधी देण्यासह पुढील काळातही आवश्यक ती तरतूद करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ‘ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष कैलास गावडे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘जमिनीची घटती सुपीकता, खतांचा वाढता खर्च, पाण्याची कमतरता, उसाची घटती उत्पादकता, वातावरणीय बदल, घटता उतारा यामुळे शेतकरी आणि कारखाने अडचणीत आले आहेत. ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या वापराने उसाच्या उत्पादनात ४० टक्क्यांवर वाढ झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे शेतीला किफायतशीर करण्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञान ‘गेमचेंजर’ ठरणार आहे. उसासोबतच फळबागा, कापूस, सोयाबीन पिकासाठीही ‘एआय’च्या वापराची तयारी करण्यात येत आहे.’
‘वाढती लोकसंख्या, वाढते नागरीकरण, विकासकामांसाठी जमिनीचा वापर यामुळे शेतजमीन कमी होत आहे. उपलब्ध जमिनीत जास्तीचे उत्पादन काढल्याशिवाय देशाला आवश्यक कृषी उत्पादन मिळू शकणार नाही. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल,’ असेही ते म्हणाले.
‘ऊसउत्पादक शेतकऱ्यांना ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी हेक्टरी २५ हजार रुपये खर्च येणार असून, त्यांपैकी नऊ हजार रुपये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, साखर कारखाना पावणेसात हजार रुपये अग्रिम म्हणून देणार असून, शेतकऱ्यांनी नऊ हजार रुपये भरायचे आहेत. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा लाभ घेतला पाहिजे,’ असे उपमुख्यमंंत्री पवार यांनी सांगितले.
‘राज्यातील शेतकऱ्यांचे ‘ठिबक’चे अनुदान यापुढे वेळेवर मिळेल, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील राहील. ‘एआय’च्या वापरासाठी ठिबक सिंचन आवश्यक आहे. हवामानात बदल होत असताना त्यावर मात करण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे,’ असे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.
‘पवार कुटुंबात काकांचे पुतण्याला पाठबळ’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय प्रवासाबाबत आमदार रोहित पवार यांचे वडील, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार म्हणाले, ‘पवार कुटुंबात प्रत्येक काकाने आपल्या पुतण्याला पाठबळ दिले आहे. हीच आमची रीत आहे. अजित पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले, तेव्हा माझे वडील आप्पासाहेब पवार यांनी अजित पवार यांना साथ दिली. नवख्या उमेदवाराला किती मते मिळतात, हे सगळ्यांना ठाऊक आहे. पण त्यानंतर अजित पवार यांनी ३५ वर्षे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे नेतृत्व केले. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माझे वडील माझा विचार करतील, असे मला वाटले होते; पण काकांना नेहमी पुतणेच दिसतात. मला संधी मिळाली नाही. वडिलांनी अजित पवार यांना पुढे केले.’