शिरूर : शिकण्याची उर्मी असेल तर वय कधीच अडसर ठरत नाही, हे शिरूरचे बाबूराव कोंडिंबा पाचंगे यांनी खरे करून दाखवले आहे. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी विधी पदवी प्राप्त करत वकिलीचे स्वप्न साकार केले आहे.पाचंगे यांनी पुणे आयटीआयमधून प्रिटिंगचा कोर्स पूर्ण करून, ‘शक्ती प्रिंटर्स’ या व्यवसायाच्या माध्यमातून यशस्वी उद्योजकतेचा पाया रचला. व्यवसायात सचोटी, मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी मोठे यश मिळवले. सामाजिक कार्यातही सक्रिय राहून, मुद्रक संघटनांत काम करत, ‘भीमाशंकर प्रिटिंग क्लस्टर’ उभारण्यात त्यांचा मोठा सहभाग राहिला. व्यवसायाच्या व्यापात असूनही उच्च शिक्षणाची ओढ त्यांनी कधीच सोडली नाही. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत त्यांनी बी.ए. (समाजशास्त्र) पदवी प्राप्त केली. अहिल्यानगरच्या सी.डी. देशमुख विधी महाविद्यालयात प्रवेश घेत विधी शिक्षण पूर्ण करून यंदा वकिलीच्या परीक्षेत यश मिळवले.
याबाबत बाबूराव पाचंगे म्हणाले,‘ खरेतर ६० वर्षे ही सेवानिवृत्त्तीचे वय; पण या सेवानिवृत्त्तीचा वयात बी. ए . पदवी मिळवून ६३ व्या वर्षी वकिलीची पदवी प्राप्त केली . मला परिस्थितीमुळे आणि अन्य काही अडचणीमुळे कॉलेज जीवन व उच्च शिक्षण पूर्ण करता आले नाही. आपले पदवीचे शिक्षण पूर्ण व्हावे, पदवी मिळावी असे स्वप्न होते. या स्वप्नापर्यत जाण्याचा मार्ग सापडत नव्हता. अशा वेळी चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक प्रा. चंद्रकांत धापटे यांच्याशी भेट झाली. परिस्थिती व अन्य कारणामुळे ज्यांना पदवीचे शिक्षण पूर्ण करता येत नाही असे विद्यार्थी, नागरिक हे मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण करू शकतात, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर बोरा महाविद्यालयाचा मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रात प्रवेश घेतला. कामाचा व्याप, वाढते वय यामुळे अभ्यासाचा ताण येत होता. त्यावर मात करत पदवी मिळविली.
या धडपडीत पत्नी वत्सला, मुलगा सूरज, सून सान्वी, मुलगी वर्षा आणि जावई तहसिलदार डॉ. अरविंद घेमूड, प्रा. संदीप जाधव, ॲड . गणेश सटाले, ॲड. अनिकेत पाचर्णे यांनी प्रोत्साहन दिल्याचे पाचंगे नमूद करतात. शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम, बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, प्रा. डॉ . अंबादास केत, शाहू शिक्षण संस्थेचे विश्वस्त ॲड. नारायणराव साठे, सी. डी. देशमुख विधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ॲड . रियाज बेग, प्राचार्य ॲड. सारंग गणबोटे यांनीही त्यांना या प्रवासात मदत केली.
‘समाजासाठी वकिली’
ग्रामीण भागातील लोकांना कायदेविषयक फारशी माहिती नसते. त्यांना सोप्या भाषेत कायदेविषयक मार्गदर्शन करणार आहे. तसेच समाजासाठी वकिली करत समाजसेवा करणार असल्याचे बाबूराव पाचंगे यांनी सांगितले.