पुणे : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने सुरू करण्यात येणारी भारत संचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) फोर- जी सेवा खासगी कंपन्यांच्या दबावाखाली बंद ठेवण्यात आली आहे, असा आरोप काँग्रेसचे राज्य प्रवक्ता गोपाळ तिवारी यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या फसव्या घोषणेचा काँग्रेस निषेध करत असल्याचेही गोपाळ तिवारी यांनी सांगितले. गोपाळ तिवारी म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना मोदी सरकार एकीकडे आत्मनिर्भरतेचे कथित ढोल पिटत आहे. भाजपची कृती आत्मनिर्भरतेच्या विरुध्द करत असल्याचे वारंवार सिध्द होत आहे. केंद्र सरकारने पंधरा ऑगस्ट रोजी बीएसएनएलची फोर-जी सेवा सुरू करण्याचे जाहीर केले. मात्र अद्यापही ही सेवा सुरू झालेली नाही. बीएसएनएलजी फोर- जी सेवा सुरू करण्यासाठी राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने धरणे आंदोलनही करण्यात आले होते. तत्कालीन केंद्रीय प्रसारण मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी २३ ऑगस्ट २०१९ रोजी फोर-जी सेवेसाठी ७० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. मात्र उद्योगपतींच्या ऊद्योगपतींच्या दबावामुळे ही सेवा सुरू होऊ शकलेली नाही. बीएसएनएलकडून उत्कृष्ट सेवा दिली जात असातनाही नफ्यातील सरकारी कंपनी बंद पाडण्याचा डाव केंद्रातील सरकारचा आहे. बीएसएनएलचे पायाभूत सुविधा आणि टॉवर्स चा तांत्रिक आधार घेत खाजगी टेलीकॉम कंपन्या फोज-सी सेवा देत असून फाईव्ह-जी सेवेची तयारी खासगी कंपन्यांनी सुरू केली आहे. पंतप्रधान मोदींनी १४ हजार ५०० टॅावर्स खाजगी कंपन्यांना देण्याचा घाट देखील घातला आहे. या परिस्थितीमध्ये बीएसएनएलच्या फोर-जी सेवेची घोषणा दिशाभूल करण्यासाठी केली जात असून जनेताला मूर्ख बनविले जात आहे, अशी टीका गोपाळ तिवारी यांनी केली.