शहरातील प्रदूषणाच्या पातळीत होत असलेली वाढ लक्षात घेता सुमारे सात वर्षांपूर्वी रिक्षांना सीएनजी किंवा एलपीजी इंधनाची सक्ती करण्यात आली होती. मात्र, हव्या त्या प्रमाणात सीएनजी उपलब्ध होत नसल्याने रिक्षा सीएनजीवर परावर्तित केल्या जात नव्हत्या. रिक्षा पंचायत व इतर रिक्षा संघटनांनी घेतलेल्या आंदोलनात्मक भूमिकेनंतर सीएनजीचा पुरवठा काही प्रमाणात सुधारल्याने सद्य:स्थितीत शहरातील सुमारे नव्वद टक्के रिक्षा सीएनजी किंवा एलपीजी इंधनावर धावत आहेत. प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी ही आकडेवारी सुखावणारी असली, तरी हा आकडा शंभर टक्के करण्यासाठी सीएनजीच्या आणखी पंपांची गरज आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या भुरेलाल समितीच्या अहवालानंतर पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीने रिक्षांना सीएनजी किंवा एलपीजीची सक्ती करण्यात आली होती. सक्ती झाली असताना दुसरीकडे मात्र शहरात सीएनजीचा पुरेसा पुरवठा होत नव्हता. पेट्रोलपेक्षा सीएनजीवर रिक्षा चालविल्यास फायदेशीर ठरत असतानाही केवळ सीएनजीच्या रांगेत पाच ते सहा तास घालवावे लागत असल्याच्या कारणामुळे रिक्षा सीएनजीवर परावर्तित केल्या जात नव्हत्या. पेट्रोलचे दर वाढत असल्याच्या काळात अनेक रिक्षा सीएनजीवर परावर्तित करण्यात आल्या. त्याचबरोबरीने सीएनजीचा पुरवठा सुधारण्याची मागणी करून रिक्षा संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली. त्यानंतर काही नवे पंप व चोवीस तास सुरू राहणारे पंप सुरू करण्यात आले.
महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून सध्या वारजे येथे दोन, निगडी व चाकण येथेही प्रत्येकी दोन, तर उंड्री, पिसोळी, वाघोली, वाकड, नाशिक रस्ता, कोथरूड, हडपसर येथे सीएनजीचे पंप आहेत. त्याचप्रमाणे वर्षभरात आणखी नऊ पंप सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पहाटे पाच ते रात्री बारा ही पंप सुरू ठेवण्याबाबबतही उपाययोजना करण्यात येत आहेत.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पुणे शहरात ४४ हजार ३३१ रिक्षा आहेत. तर िपपरी- चिंचवडमध्ये ५ हजार २३१ रिक्षा आहेत. दोन्ही शहरांतील मिळून सध्या ६८९६ रिक्षा पेट्रोलवर चालतात. या रिक्षाही सीएनजीवर परावर्तित होण्याच्या दृष्टीने नुकतेच रिक्षाचे वयोमान वाढविण्याचा निर्णय जिल्हा परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे. त्यानुसार रिक्षा आता नोंदणी दिनांकापासून वीसऐवजी पंचवीस वर्षे धावू शकणार आहे. त्यासाठी संबंधित रिक्षा सीएनजीची असण्याची अट आहे. त्यामुळे सीएनजी रिक्षांची संख्या आणखी वाढणार असल्याने पंपांची संख्या वाढण्याची गरज आहे. मुख्य म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये सीएनजी पंप सुरू करावेत, अशी मागणी रिक्षा संघटनांकडून होत आहे.