राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी जुन्नरमध्ये बोलताना राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन केलं. "समाजात तेढ निर्माण करण्याचं काम काहीजण करत आहेत. प्रक्षोभक भाषणं केली जात आहेत. वर्षानुवर्षे चालत असलेल्या गोष्टींबद्दल तेव्हा कोणी बोललं नाही. पण, आता कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित नांदत असताना तेढ निर्माण करण्याच काम केलं जातंय," असं अजित पवार यांनी कोणाचाही थेट उल्लेख न करता म्हटलं. तसेच पुढे बोलताना, "दंगली घडतात तेव्हा सर्वाधिक गरिबाला किंमत मोजावी लागते. सर्वधर्मीय गुण्यागोविंदाने राहात आहेत. त्याला कुठलाही डाग लागू देऊ नका. दृष्ट लागू देऊ नका," असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. अजित पवार यांच्या हस्ते जुन्नरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ स्मारकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. "छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याला भोसलेंच राज्य असं कधीच म्हटलं नाही. रयतेच, हिंदवीस्वराज्य असं म्हणण्यास शिकवलं आहे. परंतु, काही व्यक्ती राजकीय फायद्यांसाठी समाजात तेढ निर्माण करण्याच काम करत आहेत. प्रक्षोभक भाषणं करतात, पण हे गरजेचं नाही," असा टोला अजित पवारांनी लगावला. "काही गोष्टी वर्षानुवर्षे चालत आल्यात त्यावेळी कोणी बोललं नाही. आता कायदा सुव्यवस्था व्यवस्थित नांदत असताना वेगळं कसं घडेल याबद्दलचा जो प्रयत्न चालला आहे, तो तुम्हाला आम्हाला हणून पडावा लागेल. या (संघर्षातून) तुमचं माझं, राज्याचं भलं होणार नाही," असंही अजित पवार म्हणाले. "ज्या वेळेस दंगली होतात त्यावेळी गोर-गरिबाला किंमत मोजावी लागते. अनेकांच्या चूल बंद पडतील. ज्याची चांगली परिस्थिती आहे तो आठ दहा दिवस घरात राहू शकतो. याची जाणीव आपण सर्वांनी ठेवायला हवी. आपण सर्व गुण्या-गोविंदाने राहतो, त्याला कुठं ही डाग लागू देऊ नका, दृष्ट लागू देऊ नका," असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला केलं.