दररोज वाढत चाललेल्या महागाईच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी पिंपरीत निदर्शने करण्यात आली. केंद्रातील मोदी सरकारच्या निषेधार्थ आंदोलकांनी घोषणाबाजी केली.

भाजपच्या सत्ताकाळातील वाढत्या महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले. मानव कांबळे, अशोक मोरे, बाबू नायर, निर्मला कदम, सायली नढे, नरेंद्र बनसोडे, दिलीप पांढरकर, विरेंद्र गायकवाड आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलकांना पोलिसांनी अटक केली.
यावेळी मानव कांबळे म्हणाले, घरगुती गॅसवर, अन्नधान्यावर, शालेय साहित्यांवर जीएसटी आकारणारा भारत एकमेव देश असेल.

जोपर्यंत केंद्र सरकार जीएसटी मागे घेत नाही, तोपर्यंत नागरिकांनी लोकशाही पद्धतीने सरकारचा निषेध करावा. कैलास कदम म्हणाले, केंद्र सरकार चुकीची धोरणे राबवीत असून दररोज इंधनाचे दर वाढवीत आहे. त्यामुळे महागाईने कळस गाठला आहे. या महागाईमुळे बेरोजगारी वाढत आहे.