होम क्वारंटाइन केलेल्या १५ जणांनी एकाच कारमधून प्रवास केल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. वडगाव मावळ पोलिसांनी याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी नाकाबंदी करुन या सर्व व्यक्तींना पुढील प्रवास करण्यापासून रोखले.

पोलिसांच्या माहितीनुसार, हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के असलेले १६ व्यक्ती आणि काही लहान मुलं मुंबईच्या दिशेने प्रवास करत असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. त्यांना वडगाव पोलिसांनी पकडलं असून पुन्हा होम क्वारंटाईनसाठी पाठवण्यात आलं आहे. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. यात ४ महिला, ३ पुरुष आणि ९ लहान मुलं आहेत. हे सर्वजण मुंबईमधील राहणारे आहेत.

नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने मुंबईमधून हे १६ जण उस्मानाबाद येथील उमरगा येथे गेले होते. तेथील सर्व विधी करून ते परतणार तेवढ्यात गावातील नागरिकांनी हे मुंबई वरून आले असल्याने आरोग्य विभागाला याची माहिती दिली. त्यांना उस्मानाबाद येथील उमरगा येथेच हातावर शिक्के मारून होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं. मात्र, ३१ तारखेला सर्वजण गुपचूप रात्री एका मोटारीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

दरम्यान, जागोजागो नाकाबंदी असल्याने त्यांनी रात्री उशिरा प्रवास सुरु केला. मात्र, वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर नाकाबंदी सुरू होती. तेव्हा हे सर्वजण एका वाहनातून एकत्र प्रवास करत असल्याची गंभीर बाब समोर आली. त्यांच्या हातावर शिक्के असल्याचे दिसले त्यानंतर त्यांना तातडीने होम क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आलं. वडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी याचे नियोजन केले.