पुणे : करोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२०-२१ आणि २०२१-२२ या शैक्षणिक कालावधीमध्ये स्वाधार योजनेच्या लाभासाठी पात्र विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास मुदतवाड देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करता येईल. समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त संगीता डावखर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील अकरावी, बारावी आणि बारावीनंतरच्या व्यावसायिक, बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या, मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असूनही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढी शिक्षण घेता येण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जाते. त्यात भोजन भत्ता, निवास भत्ता, इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाते. मात्र, २०२०-२१ आणि २०२१-२२ या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये शैक्षणिक संस्था, महाविद्यालये प्रत्यक्ष बंद होती. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता आणि इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेतल्या आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी खोली भाड्याने घेऊन ऑनलाइन प्रणालीद्वारे शिक्षण घेतले असेल अशा पात्र विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करता येईल.