डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ अॅडव्हान्स टेक्नॉलजीमध्ये (डीआयएटी) देशाच्या संरक्षणात महत्त्वाच्या असणाऱ्या तेरा प्रकल्पांवर सध्या संशोधन सुरू असून यामधील सहा प्रकल्पांची पेटंटसाठी नोंदणी केले आहे, अशी माहिती डीआयएटीचे कुलगुरू डॉ. प्रल्हाद यांनी दिली.
डीआयएटीच्या सातव्या पदवीदान समारंभाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्राध्यापक डॉ. संगीता काळे आदी यावेळी उपस्थित होते. डॉ. प्रल्हाद म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानात राष्ट्रीय सुरक्षांमध्ये स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने डीआयएटीमध्ये संशोधन केले जाते. सध्या अॅन्टीबायोट्रीकल टॅक्सलरीज, ग्रीन सोलर सेल, सेन्सर, लिक्वीड फ्युअल, सायबर सिक्युरीटी अशा तेरा प्रकल्पांचे संशोधन सुरू आहे. यातील सहाची पेटंटसाठी नोंदणी केली आहे. देशात संरक्षणासाठी जेवढी साधनसामुग्रीची आयात करू तेवढा भ्रष्टाचार वाढेल. त्यामुळे भारतीय तंत्रज्ञान विकसित करा, अशी संरक्षणमंत्र्याची मागणी आहे. संरक्षणाच्या आयात कराव्या लागणाऱ्या गोष्टी येथे तयार होऊ लागल्या तर सर्व गुंतवणूक भारतातच होईल. त्यातून रोजगार निर्मितीही होईल. त्यामुळे वेगवेगळ्या संशोधनावर डीआयएटीने लक्ष घातले आहे. डीआयएटीने संशोधनाच्या दृष्टीने देशातील व परदेशातील विद्यापीठांशी सामंजस्य करार करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.