पुणे शहराला एक वेळ पाणी पुरवठा होत असताना, गणेश विसर्जनासाठी धरणांमधून जादा पाणी कशासाठी सोडायचे, असा सवाल करत पुण्यातील जागरूक नागरिकांच्या गटाने असे पाणी न सोडण्याचे आवाहन महापालिकेच्या आयुक्तांना केले आहे. असे पाणी न सोडल्यास पाण्याची बचत तर होईलच, त्याचबरोबर नागरिकांना नदीत विसर्जन करण्यापासून परावृत्त करता येईल, असे या गटाने म्हटले आहे.
गणेशमूर्तीचे विसर्जन नदीऐवजी हौदांमध्ये करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे केले जाते. त्याला नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. असे असताना विसर्जनासाठी नदीत जादा पाणी सोडले की नदीत विसर्जन करणाऱ्यांची संख्या वाढते. याबाबत निसर्ग संवाद संस्थेचे संचालक नंदू कुलकर्णी यांच्यासह जागरूक नागरिकांच्या गटाने महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पुण्यात सध्या एक वेळ पाणी पुरविले जाते. अशा स्थितीत गणेश विसर्जनासाठी पाणी सोडणे योग्य नाही. पुण्याला १५ दिवस पुरेल इतके पाणी विसर्जनासाठी सोडणे योग्य नाही. त्यामुळे पुण्याला उन्हाळ्यात पुन्हा टंचाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे विसर्जनासाठी धरणांमधून पाणी सोडू नये, असे या निवेदनात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont sold extra water for immersion
First published on: 05-09-2014 at 02:40 IST