घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बुधवारी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांची निवड झाली. पहिल्या फेरीतच ४९८ मते मिळवत मोरे यांनी निवडणूक जिंकल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी एकूण चार उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी डॉ. अशोक कामत यांना पहिल्या फेरीत ६५ मते मिळाली, भारत सासणे यांना ४२७ मते मिळाली, तर पुरुषोत्तम नागपुरे यांना २ मते मिळाल्याचे आडकर यांनी स्पष्ट केले. यावेळी पहिल्यांदाच साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विक्रमी मतदान झाले. १०२० मतपत्रिकांपैकी १०१९ मतपत्रिका साहित्य परिषदेकडे परत आल्या होत्या. त्यापैकी ९९२ मतपत्रिका वैध ठरल्या. त्यावरून पहिल्या फेरीतील विजयासाठी ४९७ हा कोटा निश्चित करण्यात आल्याचे आडकर यांनी सांगितले.
अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मोरे यांनी सर्वांचे आभार मानले. आपले अध्यक्षपद दिलीप चित्रे आणि भा. पं. बहिरट यांना अर्पण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारांनी सौजन्याची वागणूक दिली, त्याबद्दल त्यांनी त्यांचेही आभार मानले.
संत नामदेव यांच्या कर्मभूमीत पंजाबमधील घुमानमध्ये पुढील वर्षी ३ ते ५ एप्रिलदरम्यान हे साहित्य संमेलन होणार आहे.