रिक्षाचालकांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच परिवहन मंत्री यांच्याशी चर्चा करून प्रश्नावर योग्य तो तोडगा काढण्याचे प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत आंदोलन शांततेच्या मार्गाने करावे आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी केले आहे.पुणे शहरात रिक्षाचालकांचे आंदोलन आणि आजचा पुणे बंद या कारणांमुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बापट यांनी हे आवाहन केले आहे. हेही वाचा >>>पुणे: भरभराटीसाठी काँग्रेस भवनमध्ये होमहवन? प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रत्यक्ष भेटून आंदोलकांशी बोलण्याचे कितीही मनात असले तरी दुर्दैवाने ते शक्य नाही. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या जीवनावर परिणाम होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. सर्व आंदोलनकर्त्यांनी आंदोलन शांततेच्या मार्गाने करावे. रिक्षाचालकांच्या प्रश्नात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच परिवहन मंत्री यांच्याशी चर्चा करण्यात येईल. रिक्षाचालकांच्या प्रश्नावर योग्य तो तोडगा काढण्याचे प्रयत्न करण्यात येतील. तोपर्यंत सर्व आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पाडावे आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे खासदार गिरीश बापट यांनी म्हटले आहे.