पुणे: ‘महापालिकेच्या निवडणुकीसाठी २०२२ मध्ये जी प्रभागरचना होती, त्याच प्रभागरचनेनुसार राज्यातील महापालिकेच्या निवडणुका होतील,’ असे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

‘निवडणूक घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणुका घेतल्या जाणार असून, महायुतीच्या माध्यमातून राज्यात सत्ताधारी असलेले तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवतील,’ असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.

राज्यातील महापालिका आयुक्त आणि नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांच्या कार्यशाळेचे आयोजन ‘यशदा’ येथे करण्यात आले होते. त्यानिमित्त आले असता, शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूक घेण्याबाबतचे काम निवडणूक आयोगाकडून सुरू झाले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार २०२२ नुसारच प्रभागरचना असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात सत्ताधारी असलेले तिन्ही पक्ष लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून लढले. त्यामुळे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकादेखील महायुतीच्या माध्यमातूनच लढविण्यात येणार आहेत.’