वृक्षतोड, अनियमित बांधकामे आणि पवनचक्क्या ही प्रामुख्याने माती ठिसूळ होण्याची कारणे असून, त्यामुळेच पावसाच्या काळात दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत असल्याचे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले. वृक्षतोडीमुळे माती ठिसूळ होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे मातीचा मोठा ढिगारा डोगर उतारावरून खाली येतो, असे त्यांनी सांगितले.
डोगरमाथ्यावरील पवनचक्क्यांमुळेही भूस्खलन होत असल्याची शक्यता त्यांनी वर्तविली. ते म्हणाले, पवनचक्क्या या डोंगराच्या माथ्यावर उभारल्या जातात. त्याचबरोबर तिथे पोहोचण्यासाठी रस्तेही तयार केले जातात. त्यामुळे डोंगराच्या मूळच्या रचनेला धक्का बसतो आणि दरड कोसळण्याची घटना घडते. काही ठिकाणी खडी निर्मितीचे बेकायदा कारखाने सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळेही दरडी कोसळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
सरकारी पातळीवर या सर्व गोष्टींबद्दल अनास्था असल्यामुळे अडचणीत आणखीनच भर पडते, असे सांगून कोणतेही नवीन बांधकाम किंवा विकासप्रकल्प राबविताना पंचायत पातळीपासूनच नियोजन केले गेला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.